अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! कार्यसम्राट खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर
आशेले गाव परिसरात यापूर्वी आठवड्यातून तीन वेळा पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, सध्या परिस्थिती गंभीर झाली असून आठवड्यातून केवळ १५ मिनिटे पाणी मिळत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका कीर्ती ढोणे यांनी केला आहे. अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना दैनंदिन गरजा भागवतानाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाणीटंचाईच्या प्रश्नावर कीर्ती ढोणे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. त्याचबरोबर महापौर हर्षाली चौधरी यांच्याकडेही समस्या मांडत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली . पाणीपुरवठ्यातील अडथळे नेमके कशामुळे निर्माण झाले, याचा शोध घेऊन आशेले गावातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष उपाययोजना करावी, अशी मागणी ढोणे यांनी केली आहे. पुढील आठ दिवसांत पाणीटंचाईचा प्रश्न सुटला नाही, तर KDMC आयुक्तांच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रश्नासंदर्भात महापौर हर्षाली चौधरी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्यावर “माझ्याकडे निवेदन आले आहे, बघू काय करायचे आहे,” अशा स्वरूपाचे उत्तर मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी किती गंभीर आहेत, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
कल्याण-डोंबिवलीतील काही भागांत खराब रस्ते, वीजपुरवठ्यातील अडथळे आणि पाणीपुरवठ्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशात आशेले गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षाचा मुद्दा बनण्याची चिन्हे असून, आठ दिवसांच्या अल्टिमेटमनंतर प्रशासन काय पावले उचलते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Dombivli News: मुसळधार पावसातही तिरंगा रॅलीचा जल्लोष; संस्था-शाळांचा श्रीकांत शिंदेंच्या हस्ते गौरव






