नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती
Nepal Flood News : नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयानंतर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील शेकडो पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी शिवसेनेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल यांच्या नेतृत्वातील बचाव पथकाने नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरुप मायदेशी परत आणले. यात नाशिकमधील ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नेपाळमध्ये महाप्रलयानंतर तेथे पर्यटनासाठी गेलेले हजारो पर्यटक अडकले आहेत. महाराष्ट्रातून गेलेल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल यांच्या नेतृत्वात एक मदत पथक मागील चार दिवसांपासून नेपाळमध्ये कार्यरत आहे. या पथकाने महाराष्ट्रातील पर्यटकांशी संपर्क सुरु केला असून यातील ४८ पर्यटकांना सुखरुप मायदेशी पाठवण्यात आल्याचे निरुपम म्हणाले.
कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले ३७ पर्यटक २९ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या माध्यमातून पुण्यात परतले. या पर्यटकांना काठमांडू ते गोरखपूरपर्यंत बसमार्गे आणि तेथून विमानाने पुण्यात पाठवण्यात आले. तसेच नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातील ११ विद्यार्थी नेपाळला गेले होते. या सर्व विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या पथकाने सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना अन्नपदार्थ, औषधे यांची मदत केली आणि पुन्हा नाशिकला परतण्याची व्यवस्था केल्याचे निरुपम म्हणाले. यात शुभम शिंदे, ओकांर शिंदे, आय़ुष शिंदे, रुपेश बोंगे, विशाल शिंदे, करण शिंदे, आकाश कौतुडकर, रोहीत शिंदे, अभिषेक पवार, अर्जुन शिंदे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
निरुपम पुढे म्हणाले की, मुंबईतील ६६ पर्यटक अद्याप नेपाळमधील प्रलयात बेपत्ता आहेत. यात डॉ. चितळे यांचाही समावेश आहे. या सगळ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या बचाव पथकाकडून केले जात आहेत. दोन देशांमध्ये सीमा असतात पण माणुसकीला सीमा नसते, म्हणूनच शिवसेना सीमा ओलांडून मदतीचे काम करत आहे, असे निरुपम म्हणाले. यापूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ६०० पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याचे काम शिवसेनेकडून करण्यात आले होते, असे ते म्हणाले.
बाबरच्या नेतृत्वात मुघलांनी भारतात खूप अत्याचार केले हे विसरता येणार नाही. अयोध्येत श्रीरामांच्या जन्मभूमीवर बाबरच्या नावे बाबरी मस्जिद होती, तो एक कलंक होता तो मिटवण्याचे काम आम्ही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तान केले म्हणजे बाबरे पाप आम्ही विसरु शकत नाही, असे संजय निरुपम म्हणाले. त्यामुळे ओवेसी यांनी बाबर प्रेम आवरावे, अशी टीका संजय निरुपम यांनी केली. अफगाणिस्तानातून मोहम्मद गझनी, मोहम्मद घोरी यांनी भारतावर आक्रमण केली, सोमनाथ मंदिर १७ वेळा लुटले. सोमनाथवरील हल्ल्याला एक हजार वर्ष पूर्ण झाली. मात्र आधुनिक अफगाणिस्तानच्या पुनर्निमाणात भारताचे मोठे योगदान आहे, असे निरुपम म्हणाले.






