फोटो सौजन्य- गुगल
चार महिने दर्यापासून दूर राहिलेल्या कोळी बांधवांना आता पुन्हा समुद्राची ओढ लागली आहे. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कल्याणच्या भोईवाडा कोळीवाड्यात सणाची लगबग सुरू झाली असून, आज २७ ऑगस्टला पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. मिरवणूक काढत कोळी बांधव खाडीकिनारी समुद्रपूजेसाठी जाणार आहेत.
कल्याण भोईवाडाकरांची गणेश घाटापर्यंतची पारंपरिक कोळी वेशभूषा आणि कोळी गीतांच्या गजरात निघणारी मिरवणूक म्हणजे संस्कृतीचा जिवंत आविष्काच असतो. पारंपरिक कोळी वेशभूषेत महिला-पुरुष मिरवणुकीत सहभागी होतात. ढोलाच्या तालावर कोळी गाणी म्हणत, नाचत आणि जल्लोष करत ही मिरवणूक गणेश घाटावर पोहोचते. तेथे नारळाची पूजा करून तो दर्याला अर्पण केला जातो. ‘दर्या सुखाचा ठेव, आमच्या बोटी सुखरूप परत येऊ दे, कामधंद्याला बरकत दे, अशी प्रार्थना करून कोळी बांधव समुद्राला नमन करतात. कोळी समाजासाठी हा सण म्हणजे नव्या हंगामाची सुरुवात असते. पावसाळ्यात मासळीचा प्रजननकाळ असल्याने तसेच समुद्र खवळलेला असल्याने सुमारे चार महिने मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमेनंतर मात्र समुद्राची पूजा करून बोटी पुन्हा दर्यात सोडल्या जातात. त्यामुळे कोळी समाजासाठी हा सण केवळ उत्सव नसून मासेमारीच्या हंगामाची सुरुवात आणि दर्याशी असलेल्या नात्याचा सोहळा आहे.
नारळी पौर्णिमेच्या आठवडाभर आधीच तरुण-तरुणी पारंपरिक कोळी वेशभूषेत सजून नदीकिनारी फोटोशूट करताना दिसून आले. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने, कोळी टोपी आणि पारंपरिक पोशाखात सजलेली तरुणाई कॅमेऱ्यासमोर ‘पोझ’ देत होते. नुकतेच कल्याणच्या गणेश घाटावर पारंपरिक वेशात सजलेल्या तरुणाईंच्या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे यंदाच्या नारळी पौर्णिमेबरोबरच पारंपरिक कोळी वेशभूषेतील फोटोशूटचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.
‘नारळी पुनवच्या सणाला… येउंदे मंगारी घराला’ ‘सण आयलो गं नारळी पौर्णिमेचा’ अशा पारंपरिक कोळी गीतांच्या तालावर नारळी पौर्णिमेचा उत्साह आणखी वाढतो. त्यात नवनवीन कोळीगीतांची आणखी भर पडते. मिरवणुकीत सोन्याने मढलेल्या, नटलेल्या सर्वच वयोगटातील महिलांच्या उत्साहाला तरुणाईंची साथ मिळते आणि ढोलाच्या ठेक्यावर संपूर्णच कोळीवाडा जणू ताल धरतो. जुन्या कोळीगीतांबरोबर नव्या पिढीची गाणीही रंगतात. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा उत्साह म्हणजे गाणी, नृत्य आणि जल्लोषाची खास कोळी मैफल ठरते.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






