गणेशोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यात बंद AC; प्रताप सरनाईक संतापले
Mira Bhayandar : गणेशोत्सवातील उत्कृष्ट सजावटीसाठी विजेत्यांचा सत्कार, पारितोषिकांचा वर्षाव आणि उत्साहाचे वातावरण असतानाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहातील बंद वातानुकूलन यंत्रणेमुळे संपूर्ण कार्यक्रमाला वेगळेच वळण मिळाले. नाट्यगृहात उपस्थित नागरिक आणि स्पर्धक उकाड्याने हैराण झाल्याचे निदर्शनास येताच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. ‘पालिकेला भीक म्हणून १०० रुपयांची मनीऑर्डर पाठवतो’, असा बोचरा टोला लगावत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि शिवसेना मिरा-भाईंदर शहर यांच्या वतीने शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘शहीद मेजर कौस्तुभ राणे स्मृती गणपती सजावट स्पर्धा २०२५’ च्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड पूर्व येथे करण्यात आले होते. सार्वजनिक तसेच घरगुती गणेश सजावटीला प्रोत्साहन देतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
स्पर्धेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. साईनाथ मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. शीतल नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला द्वितीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये, तर शांतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर-२ यांना तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रुपये देण्यात आले.
याशिवाय गर्जना मित्र मंडळाला उत्तेजनार्थ १० हजार रुपये देण्यात आले. विशेष कामगिरी करणाऱ्या आणखी दहा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही प्रत्येकी १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
घरगुती गणेश सजावट स्पर्धेत प्रत्येक प्रभागातील विजेत्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. एकूण २७२ विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार, तृतीय क्रमांकासाठी २ हजार आणि उत्तेजनार्थ क्रमांकासाठी १ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
विजेत्यांचा सत्कार सुरू असतानाच नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याने उपस्थित नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक आणि स्पर्धक उपस्थित असल्याने नाट्यगृहातील वातावरण अधिकच त्रासदायक झाले. नागरिकांच्या गैरसोयीची बाब लक्षात येताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावेळी मंत्री सरनाईक यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा एकही पैसा खर्च न करता राज्य शासनाच्या २०० कोटी रुपयांहून अधिक निधीतून लता मंगेशकर नाट्यगृह आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्यात आले. या वास्तू सांस्कृतिक विकासासाठी महापालिकेकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत.
नाट्यगृहातून वर्षाला सुमारे १० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा दावा करत सरनाईक यांनी पालिका प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर सवाल उपस्थित केला. सर्वसामान्य रसिकांकडून तिकीटाचे पैसे घेतले जात असताना त्यांना नाट्यगृहात उकाड्यात बसावे लागते; मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये एसीची सुविधा व्यवस्थित सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
पालिकेच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी आपण स्वतः राज्याचा मंत्री असूनही महापालिकेला १०० रुपयांची मनीऑर्डर ‘भीक’ म्हणून पाठवणार असल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले. नाट्यगृहातील एसी दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेकडे पैसे नसतील तर नागरिकांनीही आपल्या पारितोषिकाच्या रकमेतून १०० रुपये काढून महापालिकेला मनीऑर्डर पाठवावी, असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला.
या वक्तव्यामुळे कार्यक्रमातील वातावरण काही काळ गंभीर झाले. विजेत्यांच्या सत्काराचा कार्यक्रम असतानाच महापालिकेच्या कारभारावर मंत्र्यांनी केलेली थेट टीका उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली.
लता मंगेशकर नाट्यगृहातील एसी बंद पडण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचे नाट्यरसिकांचे म्हणणे आहे. नाट्यगृहातील सुविधांबाबत यापूर्वीही काही रसिकांनी तक्रारी केल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे केवळ कार्यक्रमाच्या दिवशी एसी बंद राहिल्याचा मुद्दा नसून नाट्यगृहाच्या नियमित देखभाल-दुरुस्तीच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, मिरा-भाईंदरच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाची असलेली ही वास्तू असूनही तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
बांधकाम परवानगीसोबतच होणार जमिनीचा NA; कार्यालयांच्या फेऱ्या आता वाचणार
नाट्यगृह, कलादालन आणि अन्य सांस्कृतिक वास्तूंची योग्य देखभाल करून त्या नागरिकांसाठी उत्तम सुविधांसह उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. केवळ वास्तू उभारणे पुरेसे नसून त्यांची नियमित देखभाल, तांत्रिक यंत्रणांची दुरुस्ती आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा देणे आवश्यक असल्याचा सूर यावेळी उमटला.
गणेशोत्सवातील गुणवंत मंडळे आणि घरगुती सजावट करणाऱ्या स्पर्धकांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला सोहळा त्यामुळे एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. विजेत्यांचा सत्कार झाला; मात्र बंद एसीमुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावरच ‘चपराक’ बसली, अशी चर्चा कार्यक्रमानंतर शहरात रंगली.






