
फोटो सौजन्य - Social Media
सातारा : Satara शहरातील सदरबझार येथील हनुमान मंदिर परिसरात Rashtriya Swayamsevak Sangh च्या शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील पहिले हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. शहरात एकूण १७ ठिकाणी हिंदू संमेलनांची मालिका आयोजित करण्यात आली असून, त्याची सुरुवात १ व २ एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमाने झाली. या उपक्रमामुळे शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
या संमेलनात हिंदू समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, सामाजिक मूल्ये आणि एकोपा यावर विशेष भर देण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी ‘राष्ट्रीयत्व हा एकजिनसी समाजाचा गाभा आहे’ असे प्रतिपादन करत जाती-पातींच्या पलीकडे जाऊन समाज एकत्र येण्याचे आवाहन केले. हिंदू संस्कृतीचे जतन, परंपरांचे संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत त्यांची माहिती पोहोचवणे हे या संमेलनामागचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बदलत्या काळात समाजातील एकता टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१ एप्रिल रोजी सदरबझार परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत श्री हनुमान आणि महिषासुर मर्दिनी यांच्या वेशभूषेतील कलाकारांनी सादर केलेली रूपे, भजनी व कीर्तन मंडळांचे सादरीकरण, तसेच ऐतिहासिक शस्त्रविद्येचे आकर्षक प्रदर्शन यामुळे वातावरण भारावून गेले. फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेली ही शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. लहान मुलांनी विविध ऐतिहासिक महापुरुष आणि रणरागिणींची वेशभूषा साकारत उपस्थितांची मने जिंकली. स्थानिक युवक, महिला आणि बालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
२ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात शाहीर शुभम भुतकर यांच्या जोशपूर्ण पोवाड्याने उपस्थितांना रोमांचित केले. भक्ती डाफळे यांनी महिलांसाठी आणि युवकांसाठी केलेले मार्गदर्शन सामाजिक जागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरले. संत महंत परशुरामजी महाराज वाघ यांचे आशीर्वचन आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रमाला वैचारिक दिशा मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि समाजातील योगदान याविषयीही यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.
या संमेलनातून हिंदू समाजाचे ऐक्य, संस्कृतीचे रक्षण आणि सामाजिक एकत्रीकरणासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या उपक्रमामुळे सातारा शहरात सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक अभिमान अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.