
आदिवासी क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग! मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड
दुर्गम व आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आधुनिक शेतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पारंपरिक धान शेतीवर अवलंबून असलेल्या या भागात आता नगदी फळपिकांच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तनाची नवी दिशा मिळत आहे. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे प्रगतशील शेतकरी सुबेनराव गंगाराव येरमे यांनी यशस्वीपणे केलेली स्ट्रॉबेरी लागवड. गोमणी परिसरात प्रामुख्याने धान व पारंपरिक पिकांची शेती केली जाते. मात्र उत्पादनातील अनिश्चितता, वाढते खर्च आणि बाजारातील चढ उतार लक्षात घेत सुबेनराव यांनी पर्यायी नगदी पिकांचा विचार करून कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत, सेंद्रिय खतांचा वापर आणि प्लास्टिक मल्चिंग तंत्राचा अवलंब करण्यात आला.(फोटो सौजन्य – istock)
ठिबक सिंचन पद्धतीमुळे पाण्याची बचत झाली तसेच पिकाला आवश्यक तेवढेच पाणी देणे शक्य झाले. रोपांमधील शास्त्रीय अंतर, नियमित कीडनियंत्रण आणि हवामानातील बदलांपासून संरक्षण यामुळे पिकाची वाढ उत्तम झाली. पहिल्याच हंगामात आकर्षक, दर्जेदार आणि बाजारपेठेत मागणी असलेली स्ट्रॉबेरी उत्पादित झाली. स्थानिक बाजारात या फळाला चांगला प्रतिसाद मिळाला. उत्पादन खर्च वजा जाता समाधानकारक नफा मिळाल्याने सुबेनराव यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. दुर्गम भागातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उच्च मूल्याचे पीक घेता येते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे, शेजारच्या गावांतील शेतकरी प्रत्यक्ष शेतभेट देऊन लागवडीबाबत माहिती घेत आहेत. कृषी विभागानेही या प्रयोगाचे कौतुक करत जिल्ह्यात विविध फळपिकांच्या लागवडीस मोठी संधी असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील शेतीत परिवर्तन घडवून आणणारी ही विकासगाथा गडचिरोली जिल्ह्यासाठी आशादायी ठरत आहे. पारंपरिकतेपासून आधुनिकतेकडे वाटचाल करत उत्पन्नवाढ साधण्याचा हा प्रयत्न निश्चितच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
स्ट्रॉबरी हे उच्च मूल्य असलेले नगदी फळपीक असून योग्य हवामान, सेंद्रिय व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास कमी क्षेत्रातही चांगले उत्पादन मिळू शकते, विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी मुलचेरा, यांनी याबद्दल मत व्यक्त केले आहे.