
ऊस गाळप वाढणार, यंदा कसा असणार गळीत हंगाम? साखर आयुक्तांनी दिली सविस्तर माहिती
यंदा १.६७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप अपेक्षित
पुणे जिल्ह्यात गतवर्षी बंद असलेला अनुराज शुगर्स हा खाजगी कारखाना यंदाचा ऊस गाळप हंगाम घेणार आहे. त्यामुळे चालू वर्षी ९ सहकारी व ६ खाजगी मिळून १५ साखर कारखाने सुरू राहतील आणि या कारखान्यांकडून ऊस गाळप परवान्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता सुमारे १ लाख ४ हजार ५०० मेट्रिक टनाइतकी आहे. याचा विचार करता १६० दिवस साखर कारखान्यांचा हंगाम सुरू राहू शकतो. म्हणजेच १५ एप्रिलपर्यंत कारखाने सुरू राहतील.
पावसामुळे ऊस तोडणीस होणार विलंब
राज्यात दिनांक १ नोव्हेंबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झालेला आहे. मात्र, सध्या पावसाची हजेरी कायम असल्याने ऊस तोडणीस विलंब होण्याचीच दाट शक्यता आहे. कारण शेतामध्ये चिखल असल्याने कामगारांनाही ऊस तोडणी अडचणीची आहे. शिवाय ट्रॅक्टर व अन्य वाहनांद्वारे वाहतूक करणेही कठीण आहे. त्यामुळे पावसाची पूर्ण उघडीप झाल्याशिवाय ऊस तोडणीस गती येण्याची शक्यता सध्या दिसत नाही. शिवाय कारखान्यांना अद्याप साखर आयुक्तालयाकडून यंदाचा ऊस गाळप परवानाही वितरण होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.