भोर विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत; 'हे' तगडे उमेदवार रिंगणात
भोर/रुपेश जाधव : भोर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शंकर मांडेकर यांच्यात अटीतटीची लढत होईल, असे वाटत असले तरी महायुतीत बंडखोरी करत रिंगणात उतरलेले शिवसेना (शिंदे) गटाचे कुलदीप कोंडे, भाजपचे किरण दगडे यामुळे भोर विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत होणार आहे. भोर विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार आहे असे असले तरी मात्र भोर मधील आमदार कोण? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
भोर मतदारसंघात गेल्या निवडणूकीत शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी आमदार संग्राम थोपटे यांना चांगलाच शह दिला होता. मात्र किरकोळ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यामुळे शिवसैनिक या जागेसाठी दावेदार असल्याची कार्यकर्त्यांसह जनसामान्य जनतेत चर्चा होती. मात्र कोंडे यांना डावलले तसेच या मतदारसंघात गेली दोन वर्षे भाजपचे किरण दगडे यांनी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करीत केले. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत चांगलाच तगडा जनसंपर्क तयार केला असताना त्यांचा विचार केला नाही, तर तालुक्यात विविध प्रकारच्या योजना, विकास कामे करुण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणारे अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना डावलत महायुतीने शिवसेना (उबाठा)चे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांना आयात करुन शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी (अजित पवार) गटातून उमेदवारी जाहीर केल्याने शिवसैनिकासह अजित पवार गटातील कार्यकर्ता नाराज झाल्याचे चित्र पहायला मिळते. त्यामुळे बंडखोरीचा पवित्रा घेत शिवसेना (शिंदे) गटाचे कोंडे व किरण दगडे यांनी निवडणूक आखाड्यात शड्डू ठोकले असल्याने याचा फटका महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना बसणार असल्याची चर्चा आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील ‘या’ हायप्रोफाइल केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, जामीन फेटाळल्यामुळे आरोपीची अटक निश्चित
ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून तळागाळापर्यंत पक्षाची उभारणी भक्कमपणे केली. त्यानंतर पुत्र संग्राम थोपटे यांनी पक्षाची पुनर्बांधणी करुन कार्यकर्त्यांची मोठी फळी व ताकद पक्षामागे उभी केली आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीची हॅटट्रिक केली. तसेच लोकसभा निवडणुकीत थोपटे व पवार यांच्यामधील राजकीय संघर्ष संपुष्टात आला असल्याने सुप्रिया सुळे यांना तालुक्यातून भरघोस मतदान झाले. यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शरद पवार यांची मिळालेली साथ, त्यातच आंबेडकरी चळवळीतून उमेदवारी अर्ज नसल्याने व भोर तालुक्यातील आंबेडकरी जनतेसाठी उभारलेल्या दिक्षाभूमिमुळे बौद्ध मतदारांचा एक गठ्ठा मतदान संग्राम थोपटे यांच्या गोटात जाणार असल्याने यांच्यासाठी यावेळी ही मोठी जमेची बाजू ठरणार आहे.
शिवसेना (उबाठा)चे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांनी भोर राजगड (वेल्हे) मुळशी तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसंवाद यात्रेद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या मतदार संघात शिवसेना दावेदार असल्याची चर्चा केली. त्यामुळे भावूक झालेला निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठाम झाला; मात्र महाविकास आघाडीतून संग्राम थोपटे यांच्या उमेदवारीची एकमुखी मागणी केली गेल्याने ऐनवेळी शिवसेना (उबाठा) पक्षाविषयी बोलली गेलेली निष्ठा, कट्टरता बाजूला ठेवून आघाडीतून बंडखोरी करत महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचा झेंडा हातात घेत उमेदवारी अर्ज भरल्याने निष्ठा व कट्टर समर्थक असल्याची वल्गना फोल ठरली व कट्टर शिवसैनिकाच्या भावना दुखावल्या गेल्याने मतदार संघात नाराजीचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच मूळचे शिवसेना (उबाठा) पक्ष जिल्हा प्रमुख मात्र उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातून मिळाल्याने स्थानिक व इच्छुक असलेले उमेदवार व त्यांचा निकटवर्तीयामध्ये नाराजीच्या सुराविषयी उघड चर्चा पहायला दिसत नसली तरी टेन्शन देणारी आहे, असेही जनसामान्य जनतेत बोलले जात आहे.
अपक्ष लढण्याचा निर्णय तारणार का?
भोर राजगड (वेल्हे) मुळशी मधून मागील विधान सभा निवडणूकीत शिवसेना पक्षातून उमेदवार असलेले कुलदीप कोंडे यांना चांगलेच मतदान झाले होते त्यांनी आमदार संग्राम थोपटे यांना चांगलाच शह दिला होता. मात्र किरकोळ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. असे असले तरी पक्ष फुटीनंतर ऐन लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक म्हणुन शिवसेना (उबाठा)चा प्रचार, प्रसार करत असतानाच अचानक महायुतीचा घटक असलेल्या सत्ताधारी शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश केल्याने शिवसैनिकात नाराजी व्यक्त केली गेली त्यातच शिंदे गटातून उमेदवारी न मिळाल्याने पुकारलेले बंड यामुळे अपक्ष लढण्याचा घेतलेला निर्णय त्यांना खरच तारणार का? मतदार साथ देणार का? असे देखील बोलले जात आहे.
दगडे, कोंडे यांनी पुकारले बंड
महायुतीच्या घटक, मित्र पक्ष, संघटनाच्या प्रमूख कार्यकर्त्यांनी अनेक बैठका घेतल्या व ठाम निर्णय घेतला कि वरिष्ठ पातळीवरून जो उमेदवार देतील त्याचे प्रामाणिकपणे काम करायचे असे पत्रकार परीषद घेत जाहीरही केले, मात्र ऐनवेळी उमेदवार म्हणुन आपला विचार न केल्याने किरण दगडे व कुलदीप कोंडे यांनी बंड पुकारले व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला; मात्र त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते खरंच महायुतीने दिलेल्या उमेदवाराचे काम करणार का? की सोबत असताना एकमेकांना सहकार्य करणार म्हणून मित्र झालेल्या अपक्ष रिंगणात उतरलेले उमेदवार किरण दगडे व कुलदीप कोंडे यांना साथ देणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.