
तिघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू लोणीतील घटना; उच्चशिक्षणाचे स्वप्न अधुरे
अहिल्यानगर : आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवून शिक्षणासाठी घरापासून दूर आलेल्या तीन तरुण विद्यार्थ्यांचा काळाने घात केला. राहाता तालुक्यातील लोणी येथील पायरेन्स संस्था संचलित व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा चंद्रपूर गावाजवळील साठवण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना समजताच एकच खळबळ उडाली.
अभिषेक गंगाधर जाधव (वय २४, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), प्रवीण प्रभाकर रसाळ (वय २३, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेश अशोक शिंदे (वय २६, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) अशी या तीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. शिक्षण घेऊन कुटुंबाचा आधार बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
२८ वर्षीय युवकाचा हिप्परगा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू; मोसिन रशीद शेख असे मृत युवकाचे नाव
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे मित्र चंद्रपूर गावातील साठवण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. वाढत्या उष्णतेमुळे त्यांनी तलावात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र, तलावातील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. आनंदाचे क्षण शोधण्यासाठी गेलेल्या या मित्रांच्या आयुष्याचा शेवट मात्र वेदनादायी झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तिघाही तरुणांना तलावातून बाहेर काढून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तलाव परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही
ग्रामीण भागातील साठवण तलाव, बंधारे आणि जलसाठे परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सूचना फलक, सुरक्षा कठडे किंवा बचाव साधनांचा अभाव असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे नागरिक सांगतात. गेल्याच आठवड्यात संगमनेर तालुक्यात देखील एका खाणीत पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तेथेही बचाव साधने नसल्याचे स्पष्ट झाले होते.