
शेतकऱ्यांनो सावध व्हा! महाराष्ट्रात चार दिवसात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता (फोटो सौजन्य-Gemini)
राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
तसेच मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. मात्र काही भागात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
पुणे हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सखा सानप यांच्या मते, पुण्यासह महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या, अकोला जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे, तर पुण्यात आज ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.
मुंबईसह किनारी भागातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे सकाळी काही भागात धुक्यासारखा थर दिसत होता, परंतु यामुळे कोणताही धोका नाही आणि लोकांना घाबरण्याची गरज नाही. विदर्भातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांत मुंबई आणि कोकण भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात चक्राकार वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट अधिक तीव्रतेने जाणवत आहे, ज्यामुळे अनेक भागात तापमानात वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट नसली तरी, विदर्भ आणि कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचे परिणाम जाणवू शकतात. हवामान खात्याने १४ मार्चनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.