
Two Dead in Accident on Solapur National Highway within Dhuldev Village
Satara Accident News : म्हसवड : माण तालुक्यातील म्हसवड शहरालगच्या धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील (Accident News) सर्व जखमींना सातारा येथील डॉ. क्रांतिसिह रुग्णालयात म्हसवड पोलीसांनी पाठवले आहे. (Satara News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा (कोडोली) येथील निकम कुटुंब हे देवदर्शनासाठी सातारा येथुन पंढरपूरला आपल्या आल्टो या चारचाकी वाहनाने निघाले होते. त्यांचे वाहन सकाळी ९ नंतर म्हसवड येथून पंढरपुरकडे निघाले होते. यावेळी धुळदेव गावच्या हद्दीत त्यांची आल्टो कार आल्यानंतर अपघात झाला. रस्ता उखडलेला असल्याने रस्त्याचा अंदाज आल्टो चालकास न आल्याने अचानक ब्रेक दाबल्याने आल्टो कार ने तीन ते चार पलट्या खाल्या. यामुळे झालेल्या अपघातामुळे आल्टोमधील दोन जण जागेवर ठार झाले तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हे देखील वाचा : समाज मनाचे प्रतिबंब मांडणाऱ्या कलाकारांचा गौरव; जागतिक रंगभूमी दिवस, 27 मार्चचा इतिहास
सदर अपघाताची माहिती धुळदेव गावात समजताच अनेक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत म्हसवड पोलीसांना याबाबत कळवले, सदर अपघाताची माहिती मिळताच पो. कॉ. अभिजीत भादुले, पो. ना. लुबाळ व पो. हवा. हांगे हे तात्काळ घटनास्थळावर पोहचले, त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने १०८ या रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना म्हसवड येथील संचित रुग्णालयात आणले त्याठिकाणी जखमींवर प्राथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने सातारा येथील डॉ क्रांतिसिह रुग्णालयात पाठवले.
हे देखील वाचा : “व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी…”; काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर?
दरम्यान सदर अपघातामुळे धुळदेव ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहेत. तसेच या अपघातास प्रशासनच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, सातारा ते सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग असुन धुळदेव गावच्या हद्दीतच या रस्त्याचे काम गत ८ वर्षापासुन रस्ते विकास महामंडळाकडुन रखडवण्यात आले आहे, सदरचे काम पूर्ण करावे यासाठी आजवर येथील ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने करुन प्रशासनाला याचा जाब विचारला आहे, मात्र प्रशासनाने त्यांची फक्त बोळवणच केल्याने अपघातांची मालिका येथे आज ही सुरु असुन आजवर जवळपास २० जणांना याठिकाणी आपला जीव गमवावा लागला आहे, तर आजवर जवळपास ३०० हुन अधिक छोटे – मोठे अपघात याठिकाणी झाले असून आणखी कितीजणांचा जीव गेल्यावर प्रशासनाला या रस्तेकामी जाग येणार असा संतप्त सवाल धुळदेव ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.