
फोटो सौजन्य - Social Media
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे स्मरण करण्यात आले. हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा जागर करत उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याला अभिवादन केले. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवरायांचे विचार आजच्या काळातही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याचे सांगितले. न्याय, शौर्य, स्वाभिमान आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित शिवरायांचे तत्त्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवचरित्र हे केवळ इतिहास नसून प्रत्येकासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सुनील काटकर, किशोर शिंदे, राम हादगे, ॲड. विनीत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे सातारा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवरायांच्या विचारांचा प्रसार आणि स्वराज्याच्या मूल्यांचे जतन करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.