
ठाकरेंचीही खरातवर लाभाची खैरात
मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे रोज नवे कारनामे समोर येत आहेत. खरातच्या राजकीय संबंधांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी यापूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातही खरातवर लाभांची खैरात केल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वळवून खरातच्या संस्थेला देण्यात आल्याचा आरोप आता होत आहे.
अशोक खरातच्या या वाढत्या प्रभावाचा फायदा त्याला थेट शासकीय निर्णयांमध्येही झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या ‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या खरातसाठी दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलै २०२० रोजी यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. शेतकऱ्यांसाठी असलेले पाणी खासगी संस्थानाला वळवण्यात आल्याचा आरोप यामुळे अधिकच बळकट झाला आहे.
दरम्यान, खरातचा मंत्रालयातील दबदबा किती मोठा होता, याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना दबाव, धमक्या आणि फोन कॉल्स येत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्याच्या संपर्कात असलेल्या प्रभावशाली व्यक्तीमुळे त्याला अनेकदा संरक्षण मिळाले, असेही बोलले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अधिकारी-नेते-उद्योजकांचे सिंडिकेट उभारले
अशोक खरात हा एका दिवसात प्रभावशाली झाला नाही. त्याने वर्षानुवर्षे राजकीय वर्तुळात मजबूत संबंध निर्माण केले होते. अनेक मंत्री, खासदार आणि आमदार त्याच्या संपर्कात असल्याचे फोटो आणि व्हिडिओद्वारे समोर आले आहे. या प्रभावाच्या जोरावर तो प्रशासनात हस्तक्षेप करत होता. अधिकाऱ्यांच्या बदल्या घडवत होता आणि विविध ठिकाणी व्यावसायिक भागीदारीही करत असल्याचे समोर आले आहे. या सगळ्याचा वापर करून त्याने अधिकारी-नेते-उद्योजकांचे एक ‘सिंडिकेट’ उभे केल्याची चर्चा आहे.
आधी मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या
भोंदूबाबासोबत महायुती सरकारमधील मंत्र्यांचे फोटो आहेत म्हणून त्यांचे राजीनामे घ्यायला हवेत, असे उच्चरवात बोलणाऱ्या संजय राऊतांना आव्हान देत भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, या न्यायाने तर राऊतांनी आणि उद्धव ठाकरे यांनी हिंमत दाखवून मिलिंद नार्वेकर यांचा आधी राजीनामा घ्यायला हवा आणि मग सत्ताधारी मंत्र्यांबद्दल बोलावे. कारण नार्वेकर यांचे भोंदूबाबासोबत फोटो समोर आले आहेत.
संजय राऊत राजीनामा देणार का?
नाशिकचे संपर्क मंत्री असताना राऊतांसोबतही भोंदूबाबाचे फोटो समोर येतील तेव्हा राऊत खासदारकीचा राजीनामा देणार का, असा खोचक सवाल बन यांनी केला.