फोटो - टीम नवराष्ट्र
लातूर : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. महायुती सरकारसमोर आरक्षणावरुन मोठा पेच निर्माण झाला असून अनेक राजकारण्यांनी या मुद्द्यांवरु प्रतिक्रिया दिल्या आहेत. आरक्षणाचा मुद्दा असला की जेष्ठ नेते शरद पवार यांचे नाव आवश्य घेतले जाते. सध्या ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षण ओबीसीमधून देऊ नये यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बचाव यात्रा काढली आहे. ही यात्रा लातूरमध्ये असताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांनी आरक्षणावरुन आगीत तेल ओतत आहेत अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
शरद पवार यांना काय साध्य करायचं आहे?
जेष्ठ शरद पवार यांनी आरक्षणावरुन मत मांडले. या राज्याचा प्रश्न असून तो राज्यामध्येच सोडवावा लागेल अशा आशयाची भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका न मांडल्यामुळे त्यांच्या विरोधी पक्षांनी टीकास्त्र डागलं आहे. लातूरमध्ये ओबीसी बचाव यात्रा असताना प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल उतरण्यासाठी उतरले आहेत. शरद पवार आगीत तेल ओतत आहेत. नामांतराचा मुद्दा काढण्याचं कारण काय? नामांतर होऊन इतकी वर्षे झाली आहेत. फुले, शाहू, आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का? हा मुद्दा आत्ता उपस्थित करुन शरद पवार यांना काय साध्य करायचं आहे? नामांतराचा मुद्दा बऱ्याच वर्षांपूर्वीचा होता. त्या मुद्द्याला शरद पवार ठरवून हवा देत आहेत. राज्यातील पुरोगामी विचारांच्या लोकांना उचकवण्याचं काम ते या माध्यमातून करत आहेत.” अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर केली आहेत.
जरांगे पाटील यांनी 288 जागा लढव्यावात
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहे. ओबीसीमधून सर्व मराठा समाजाला आरक्षण देण्यात याव्या अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र याला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. सरकारला जरांगे पाटील यांनी मागणी मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढवणारा असल्याचा इशारा दिला आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंनी २८८ जागा लढवल्या पाहिजेत, त्यांची मागणी मान्य झाली नाही तर त्यांनी हा पर्याय स्वीकारला पाहिजे. सर्वसामान्य मराठ्यांना न्याय देण्यासाठी, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी मनोज जरांगेंनी २८८ जागांवर निवडणूक लढवली पाहिजे. राज्यातील श्रीमंत मराठा समाज गरीब मराठ्यांचे प्रश्न दाबून टाकतो आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर मनोज जरांगेंनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे.