
विर्दभात ५९.९५ मिमी पावसाची तूट
वर्धा : पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी हवामानातील बदलामुळे विदर्भात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. तर दुसरीकडे भू-गर्भातील आणि जलाशयातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. विदर्भात ऐरवी १८ जूनपर्यंत ७९.०२ मिमी पाऊस पडतो. तर यंदा १८ जूनपर्यंत केवळ १९.०७ मिमी पाऊस विदर्भात झाला. त्यामुळे १८ जूनपर्यंत विदर्भात तब्बल ५९.९५ मिमी पावसाची तूट असल्याचे तज्ज्ञांच्या निरीक्षणात पुढे आले आहे.
पावसाच्या मृग नक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात झाली. तर २२ जूनपासून आद्रा नक्षत्राला सुरूवात होत आहे. यंदाच्या मृग सरी चांगल्या बरसेल, असा अंदाज सुरूवातीला वर्तविला जात होता. पण अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबणीवर गेला आहे. जून महिन्यातील गेल्या १८ दिवसातील स्थिती बघता विदर्भात ७९.०२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते.
महाराष्ट्रात मान्सूनची तारीख अखेर ठरली; ‘या’ तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस होणार?
पण वास्तविक पाहता या मृग नक्षत्राचे औचित्य साधून आणि पुढेही पाऊस येईल, असा अंदाज बांधत सिंचनाची सोय असलेल्या विदर्भातील विविध जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी कपाशीची धूळ पेरणी केल्याचे वास्तव आहे. पण पाऊस बेपत्ता झाल्याने धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून, त्यांच्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.
25 जूननंतर मान्सूनला वेग येणार
राज्यात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागल्याने पावसाची प्रतीक्षा वाढली असतानाच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आगामी 15 दिवसांच्या विस्तारित अंदाजाने दिलासा आणि सावधगिरीचा असा दुहेरी संदेश दिला आहे. १८ ते २४ जूनदरम्यान महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती तुलनेने कमकुवत राहण्याची शक्यता असून, २५ जूननंतर मात्र मान्सूनला पुन्हा वेग मिळून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. यात कोकण पट्टयात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस
पश्चिमी विक्षोभ, चक्रीय वारे आणि सक्रिय मान्सूनच्या प्रभावामुळे देशभरातील हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता असून, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे.
मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये
किनारपट्टी भागातील प्रतिकूल हवामानामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या प्रणालीच्या प्रभावामुळे, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि चंदीगडमध्ये मेघगर्जनेसह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाचे सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.