कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागावर ठपका ठेवण्यात आला. या नंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा दिल्लीतील राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा केलेला कट आहे, असा आरोप केला. कॅगच्या अहवालानंतर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.अशातच आता महाविकास आघाडीच्या एका गटाने गडकरींना मोठी ‘ऑफर’ दिली.
काय आहे ऑफर
विनायक राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचं एक नेतृत्व लोकप्रिय होत आहे. उद्या ते पंतप्रधानपदाचे दावेदार होतील म्हणून नतद्रष्ट दिल्लीच्या राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा कट केला आहे. हा कट उधळून लावण्याचं काम महाराष्ट्र करेन. आमची नितीन गडकरींना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसाचं पाणी त्यांना दाखवावं.”
“आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
“गडकरी त्यांना कशासाठी घाबरत आहेत. त्यांनी फक्त आवाज द्यावा. नितीन गडकरींनी ‘इंडिया’ आघाडीत यावं. आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरेही देतील,” असंही विनायक राऊतांनी नमूद केलं.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. विजय वडेट्टीवार म्हणाले होते, “कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे.”
“नितीन गडकरींविषयी सगळे सांगतात की, स्वच्छ प्रतिमा वगैरे. त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला करून त्यांचं राजकारण संपवायचं हेही एक कारण असू शकतं,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. “कॅगमध्ये भ्रष्टाचार समोर आला आहे. रस्त्यांच्या त्या समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे या कॅग अहवालावर त्यांची भूमिका काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हा अहवाल समोर आल्यावर आता केंद्र सरकार काय कारवाई करतं याकडे आमचं लक्ष आहे,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं होतं.