मुंबई – गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची (Congress-NCP) सोबत सोडण्याची मागणी आम्ही केली होती, पण उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ऐकले नाही, असे म्हणत गजानन किर्तीकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली असताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गजानन किर्तीकर यांच्यावर टीकास्र सोडले आहे.
किर्तीकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिले नाही? पाच वेळा आमदार होते, दोन्ही मंत्रिमंडळात ते मंत्री राहिले. पक्षाकडून दोनदा त्यांना खासदारकी मिळाली. त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्षासोबत आहेत. पण सर्व काही भोगलेले किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते. यामुळे फार काही सळसळ झाली नाही. ठीक आहे गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील, असं संजय राऊत म्हणाले.
तुम्ही गेलात, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण हा पक्षाला कोणताही धक्का नाही. १८ पैकी १३ तिकडे गेले असले, तरी काय झाले? त्यांना पुन्हा निवडूनही यायचे आहे ना? त्यांच्यापैकी किती निवडून येतात बघून घेऊ ना, असेही राऊत म्हणाले. तसेच, अमोल किर्तीकर यांनी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. अमोल किर्तीकर आजही शिवसेनेसोबत आहे आणि राहील, असेही राऊत यांनी सांगितले.