
'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं'; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला
राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भातील चर्चेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांच्यावर मिश्कील शब्दांत टीका केली.
मुलाखतीत फडणवीस यांना, “उद्धव ठाकरे यांना वाटत होतं की तुम्ही ऑपरेशन टायगर थांबवावं, पण तुम्ही ते केलं नाही,” असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ऐकून माझंही मनोरंजन झालं. समजा माझा मित्र पक्ष एखादं राजकीय ऑपरेशन करत असेल, तर मी ते का थांबवू? आमच्यात आता असं काय प्रेम उरलं आहे? जे आज माझ्यासोबत दिवसरात्र आहेत, त्यांना सोडून ज्यांनी साथ द्यायची वेळ आली तेव्हा आम्हाला सोडलं, त्यांच्यासाठी मी का ऑपरेशन थांबवू?”
ते पुढे म्हणाले, “राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न त्यांचा आहे, माझा नाही. माझं राजकीय अस्तित्व कसं टिकवायचं, हे मला माहिती आहे.”
उद्धव ठाकरे यांनी “राज्यात ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन फडणवीस सुरू आहे. फडणवीसांचे पंख छाटले जात आहेत,” अशी टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदी चित्रपटातील एका गाण्याचा उल्लेख करत मिश्कील टिप्पणी केली.
“हिंदीत एक गाणं आहे… ‘माना के तेरे जहां में ये नहीं कि प्यार नहीं मिलता, वो जब चाहिए तब नहीं मिलता.’ हे प्रेम मला २०१९ मध्ये हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झाला. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला, आमच्या लग्नाचे वाढदिवसही झाले. आता त्यात काय उरलं?” असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील सत्ताधारी महायुती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०१९ मधील भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांचा संदर्भ देत फडणवीस यांनी ही टिप्पणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.