
Maval ZP Election 2026: मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज मतदान होत आहे. तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसत आहे. मावळमध्ये जिल्हा परिषदेचे ५ गट आणि पंचायत समितीचे १० गण आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली असून वातावरण तापले आहे.
गेल्या सुमारे तीस वर्षांपासून मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता कायम आहे. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार यंत्रणा उभी केली असून, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. सन १९९० पासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मावळ पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकत राहिला. एका टप्प्यावर काँग्रेस व भाजपमध्ये चिठ्या टाकून कौल घेण्यात आला होता.
त्यावेळी सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे नशिबाने भाजपच्या वाट्याला आली. सभापतीपदी एकनाथ टिळे तर उपसभापतीपदी रूपलेखा होरे यांची निवड झाली होती.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून रूपलेखा ढोरे विजयी होऊन आमदार झाल्या. त्यानंतर १९९५ ते २०१८ या कालावधीत विधानसभा व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने वर्चस्व कायम ठेवले आणि सलग तीस वर्षे सत्ता अबाधित राखली.
मात्र २०१९ मध्ये मावळच्या राजकारणात मोठा बदल झाला. पूर्वी भाजपमध्ये असलेले सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यांच्या विजयासोबतच तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढू लागला.
Gujrat Crime: मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पाठवलेल्या १५ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाकडून
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा, तळेगाव आणि वडगाव नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे.
सध्याच्या घडीला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढल्याचे चित्र असले, तरी ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप आपला पारंपरिक बालेकिल्ला राखणार की राष्ट्रवादी काँग्रेस विजय खेचून आणणार, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. ७ फेब्रुवारीच्या मतदानानंतर ९ फेब्रुवारीला होणारी मतमोजणीच या राजकीय सत्तासंग्रामाचा अंतिम निकाल ठरवणार आहे.