
नारीशक्ती विधेयकासाठी साताऱ्यात महिला आघाडीचा आक्रमक मोर्चा; विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार टीका
सातारा : लोकसभेत नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने शनिवारी जनआक्रोश मोर्चा काढत विरोधकांच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी हे विधेयक अत्यावश्यक असल्याचा ठाम आग्रह यावेळी धरण्यात आला.
मोर्चाची सुरुवात शहरातील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. “नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर झालेच पाहिजे”, “महिलांचा सन्मान राखा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या आंदोलनात नगरसेविका आशा पंडित, सिद्धी पवार, हेमलता भोसले, मोनिका घोरपडे, रीना भणगे यांच्यासह नगराध्यक्ष अमोल मोहिते, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, सरचिटणीस विकास गोसावी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या निवेदनात, नारीशक्ती वंदन विधेयक महिलांच्या सन्मानासोबतच त्यांच्या राजकीय सहभागात वाढ घडवणारे महत्त्वाचे पाऊल ठरले असते, असे नमूद करण्यात आले. मात्र, विरोधकांनी याला अडथळा आणल्याने महिलांच्या प्रगतीस धक्का बसल्याचा आरोप करण्यात आला.
महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिक संधी मिळावी, त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळावा आणि समाजातील सर्व क्षेत्रांत त्यांचा सन्मान वृद्धिंगत व्हावा यासाठी हे विधेयक तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच महिलांविरोधी विचारसरणीला विरोध करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. या मोर्चाला महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, मोर्चामुळे काही काळ शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जावलीतील पाणी टंचाईवर मंत्र्यांची तातडीची ‘अॅक्शन’; शिवेंद्रराजेंच्या बैठकीत कठोर निर्देश