
( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. ५ जुलै रोजी मुंबईतील पाली हिल येथील आमिरच्या निवासस्थानी दोघांनी अत्यंत खासगी सोहळ्यात लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष विवाह कायद्यांतर्गत या जोडप्याने नोंदणीकृत विवाह केला असून, त्यांच्या लग्नाचा पहिला फोटोही चर्चेत आला आहे.
लग्नाच्या सोहळ्याला केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. याआधी आमिर खानने स्वतः सांगितले होते की, लग्नाचा कार्यक्रम साधेपणाने घरातच पार पडणार असून मोठा रिसेप्शन आयोजित केला जाणार नाही.
कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांची उपस्थिती
या खास सोहळ्यात आमिरची मुलगी आयरा खान तिच्या पतीसह, तर मुलगा जुनैद खान उपस्थित होता. अभिनेत्याची बहीण तसेच गौरी स्प्रॅटचा मुलगाही या आनंदाच्या क्षणाचा साक्षीदार ठरला. लग्नानंतर आमिर आणि गौरी दोघेही भावूक झाल्याचे सांगितले जात असून, त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
100 ते 150 पाहुण्यांची उपस्थिती
लग्न समारंभाला अंदाजे 100 ते 150 पाहुण्यांची उपस्थिती होती. मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट असतानाही पाली हिल येथील निवासस्थानी लग्नाची तयारी जोरात सुरू होती. कार्यक्रमासाठी घराची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर
गौरी स्प्रॅटसोबतचे हे आमिर खानचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने 1986 मध्ये रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
यानंतर आमिरने 2005 मध्ये किरण राव यांच्याशी विवाह केला. या दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे. मात्र, 2021 मध्ये त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही आमिरचे दोन्ही माजी पत्नींसोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत.
नव्या आयुष्याची सुरुवात
गौरी स्प्रॅटसोबत विवाह करून आमिर खानने आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. लग्नानंतर दोघांनी घरातच छोटेखानी समारंभ आयोजित केला असून, भव्य स्वागत समारंभ न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे.