
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
टीव्ही अभिनेता गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर अभिनेत्री आकांक्षा चमोला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप सीझन २’मध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रथमच उघडपणे भाष्य केले. नेशनल टेलिव्हिजनवर घटस्फोटाची माहिती देताना आकांक्षा भावूक झालेली पाहायला मिळाली. तिच्या या खुलाशाने शोमधील स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला.
शोच्या नवव्या भागात आकांक्षाने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि घटस्फोटानंतरच्या भविष्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. अभिनेत्री पामेला सेरेनासोबत बोलताना तिने सांगितले की, “माझं लग्न खूप लहान वयात झालं. मी तेव्हा फक्त २४ वर्षांची होते.” यावर पामेलाने तिला धीर देत, “तू अजूनही तरुण आहेस, तुला पुन्हा कोणीतरी नक्कीच भेटेल,” असे म्हटले.
दुसऱ्यालग्नाबाबत आकांक्षा चमोलाची स्पष्ट भूमिका
दुसऱ्या लग्नाबाबत विचारले असता आकांक्षाने स्पष्ट उत्तर दिले. ती म्हणाली, “नाही, मला पुन्हा लग्न करायचं नाही. मला वाटतं माझा तो प्रवास आता संपला आहे.”
तिने पुढे सांगितले की, घटस्फोटानंतर पहिल्यांदाच ती पूर्णपणे स्वतंत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेत आहे. “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एकटी राहणार आहे. याचा अर्थ ना माझ्या आई-वडिलांच्या घरी, ना माझ्या नवऱ्याच्या घरी. आता माझं स्वतःचं घर असेल,” असे ती म्हणाली.
‘आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचं आहे’
भविष्यातील योजनांबाबत बोलताना आकांक्षाने स्पष्ट केले की, तिला स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायचे आहे. “मी आयुष्यभर एकटीच राहीन,” असे वक्तव्य करत तिने सध्या तरी पुनर्विवाहाचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
आकांक्षाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले, तर काहींनी भविष्यात तिचा निर्णय बदलू शकतो, असे मत व्यक्त केले. मात्र, सध्या तरी आकांक्षा चमोला स्वतःचे स्वतंत्र आयुष्य, स्वतःचे घर आणि स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देणार असल्याचे तिच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.