फोटो सौजन्य - Social Media
अभिनेते सुनील शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीचा आपला आदर व्यक्त करताना नात इव्हाराशी संबंधित एक भावनिक किस्सा सांगितला आहे. अवघ्या १५ महिन्यांच्या इव्हाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोबद्दल विशेष आकर्षण असल्याचा दावा त्यांनी केला. ती दररोज सकाळी मोदींच्या छायाचित्राला नमस्कार करते आणि त्यांना काल्पनिक लाडू अर्पण करते. विशेष म्हणजे, हे कोणी शिकवलेले नसून मोदींच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी विलक्षण आकर्षण असल्याचे त्यांना वाटते, असे सुनील शेट्टी म्हणाले.
एका मुलाखतीत बोलताना सुनील शेट्टी यांनी सांगितले की, ते नरेंद्र मोदी यांचे मोठे चाहते आहेत. “मी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार करत नाही, तर एका प्रेरणादायी नेत्याविषयी बोलतो आहे. जो नेता मला प्रेरणा देतो, त्याचा मी मनापासून आदर करतो. मला माझा देश जितका प्रिय आहे, तितकेच मोदीजीही प्रिय आहेत,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी नात इव्हाराचा एक रंजक अनुभवही शेअर केला. त्यांच्या मते, एकदा विमानतळावर इव्हाराच्या नॅनीने तिला मोदीजींचा फोटो दाखवत फक्त “मोदीजी” एवढेच म्हटले होते. त्यानंतर हा प्रसंग तिच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनला.
सुनील शेट्टी म्हणाले की, आता इव्हारा रोज सकाळी साईबाबांच्या एका पुस्तकात ठेवलेला मोदींचा मोठा फोटो असलेले पान उघडते. ती फोटोकडे बोट दाखवत “मोदीजी, मोदीजी” असे म्हणते. त्यानंतर घरातील गणपती बाप्पाजवळ ठेवलेला काल्पनिक लाडू उचलून तो मोदींच्या फोटोला अर्पण करते. तिच्या या निरागस कृतीने संपूर्ण कुटुंब भारावून जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, इव्हाराला असे करण्यास घरातील कोणाचाही प्रभाव नाही. “मी, अथिया, केएल राहुल किंवा तिची नॅनी, आम्ही कोणीही तिला हे शिकवलेले नाही. नॅनीने फक्त एकदा फोटो दाखवून ‘मोदीजी’ असे म्हटले होते. त्यानंतर ती स्वतःहून हे करू लागली. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी खास जादू आहे, असे मला वाटते,” असे ते म्हणाले.
सुनील शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीची आठवणही यावेळी सांगितली. २०१० च्या सुमारास अहमदाबादमध्ये कामानिमित्त गेले असताना त्यांची मोदी यांच्याशी भेट झाली होती. ठरलेल्या वेळेनुसार त्यांनी भेट दिली आणि अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. भेटीच्या शेवटी त्यांनी आयुष्याविषयी काही मोलाचे विचार सांगितले, ज्यामुळे आपण भारावून गेलो होतो, असे सुनील यांनी सांगितले.
दरम्यान, सुनील शेट्टी यापूर्वीही अनेक मुलाखतींमध्ये नात इव्हाराबद्दल प्रेमाने बोलले आहेत. त्यांनी इव्हाराला अथिया शेट्टीची “२.० आवृत्ती” असे संबोधले असून, सकाळचा व्यायाम संपल्यानंतर तिच्यासोबत वेळ घालवणे हा दिवसातील सर्वात आनंदाचा क्षण असल्याचेही ते सांगतात. ते इव्हाराला प्रेमाने “घरची लक्ष्मी” असे म्हणतात.
कामाच्या आघाडीवर पाहिले तर, सुनील शेट्टी यांचा ‘Welcome to the Jungle’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून, चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केल्याची चर्चा आहे.






