
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ईदच्या खास मुहूर्तावर सलमान खानने आपल्या चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. सलमान खान फिल्म्सच्या ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील “चांद देख लेना” हे भावनिक गाणं नुकतंच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांची प्रेम, प्रतीक्षा आणि भावनांची नाजूक केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. या दोघांना एकत्र पाहून चाहते देखील खुश झाले आहेत. अशातच त्यांचे नवीन गाणे सोशल मीडियावर गाजत आहे.
“चांद देख लेना” हे गाणं चंद्राच्या प्रतीकातून भावना व्यक्त करतं आहे. ईदमध्ये चंद्र दर्शन आनंद आणि सणाचं प्रतीक असतं, तर करवा चौथमध्ये तो प्रेम, विश्वास आणि प्रतीक्षेचं प्रतिक मानलं जातं. या दोन्ही परंपरांना एकत्र गुंफत हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणार आहे. या आधी चित्रपटातील “मातृभूमि” या टायटल ट्रॅकला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून त्याला ५० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर व्हॅलेंटाईन डे निमित्त “मैं हूँ” हे गाणं रिलीज झाले. आता “चांद देख लेना”मुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘स्वॅगसोबत देशभक्ती…’ ‘धुरंधर 2’ पाहून Allu Arjun झाला थक्क; रणवीर सिंगचे केले तोंडभरून कौतुक
या गाण्याला हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलं असून, त्यात जुन्या आणि खऱ्या प्रेमाची आठवण जागवणारी भावनिक धून आहे. गाण्यात एका सैनिकाच्या कर्तव्य आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील भावनिक संघर्ष अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. व्हिडिओमध्ये चित्रांगदा सिंग यांनी सैनिकाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे, जी सीमारेषेवर तैनात असलेल्या आपल्या पतीची आतुरतेने वाट पाहते. हे गाणं देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबांच्या भावनांना सलाम करते.
विशेष म्हणजे, या गाण्यातून नव्या टॅलेंटलाही संधी देण्यात आली आहे. “चांद देख लेना” हे गाणं युवा गायक निहाल टौरो आणि अंकोना मुखर्जी यांनी गायले आहे, जे याआधी भजन आणि कीर्तनासाठी ओळखले जात होते. पूर्वी ‘बॅटल ऑफ गलवान’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाचं नाव आता ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ असं करण्यात आले आहे. या बदलामागे युद्धाच्या पार्श्वभूमीवर मानवी भावना आणि संवेदनशीलतेचा संदेश अधिक प्रभावीपणे मांडण्याचा उद्देश करण्यात आला आहे.
सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली सलमान खान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अपूर्व लिखिया यांनी दिग्दर्शन केलं आहे. शौर्य, त्याग आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव ठरणार आहे.