(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नागा चैतन्य हा सर्वात प्रसिद्ध दक्षिण भारतीय कलाकारांपैकी एक आहे. त्याने २०२२ मध्ये बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. ‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशानंतर अभिनेता नागा चैतन्यने कोणताही हिंदी चित्रपट साइन केलेला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याचे कारण स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, सुपरस्टार नागा चैतन्यला आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’नंतर हिंदी चित्रपट साइन न करण्यामागील कारणाबद्दल विचारले असता तो म्हणाला, “यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही. मी नेहमीच नवीन संधींसाठी तयार असतो. फक्त ‘लाल सिंह चड्ढा’नंतर मी इथे अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे, ज्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागत आहे. मी अजूनही एका चांगल्या हिंदी चित्रपटाच्या ऑफरची वाट पाहत आहे. तिथेही मी काहीतरी नवीन आणि खास करण्याचा प्रयत्न करेन.”
तो म्हणाला, “‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणादरम्यान मला खूप मजा आली. मी खूप काही शिकलो आणि तिथले लोक खूप मनमिळाऊ होते. त्यांनी माझी खूप चांगली काळजी घेतली. त्यामुळे, माझा अनुभव खरोखरच अप्रतिम होता. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, मला वाटतं की काही चित्रपटांच्या कारकिर्दीत चढ-उतार येतात हे समजण्याइतके आपण सर्व हुशार आहोत, पण त्यामुळे आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यापासून थांबत नाही. त्यामुळे, या अपयशाने माझ्या विचारसरणीत कोणताही बदल केलेला नाही.”
हिंदी चित्रपटांपासून दूर राहण्यामागचे कारण स्पष्ट करताना नागा चैतन्य म्हणतो, “‘थांडेल’ आणि ‘वृषकरम’ हे दोन्ही खूप गुंतागुंतीचे चित्रपट आहेत. ‘वृषकरम’ची गुंतागुंत चित्रीकरण सुरू केल्यावरच लक्षात आली, कारण चित्रपटाचा जवळपास ८० टक्के भाग व्हीएफएक्सवर आधारित आहे. जेव्हा तुम्ही अशा कथांवर काम करता, तेव्हा प्रक्रिया खूप गुंतागुंतीची होते. आम्हाला निर्मितीपूर्व (प्री-प्रॉडक्शन) खूप काम करावे लागते. ह्यावेळी तर कथाच खूप आव्हानात्मक आहेत. मी कोणतीही रणनीती किंवा तसे काही आखत नाहीये. मी फक्त त्या वेळी ज्या पटकथांवर काम करत आहे, त्यांना माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत आहे. साहजिकच, काही चित्रपट पटकन बनू शकतात, तर काहींना वेळ लागतो आणि मी सध्या त्याच पटकथांवर काम करत आहे. पण माझी कोणतीही तक्रार नाही, कारण शेवटी यश हेच सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही ह्या वर्षी किती चित्रपट करता किंवा करत नाही, हे महत्त्वाचे नाही.”






