अभिनेता आमिर खानचा नुकताच प्रदर्शित झालेला लाल सिंग चड्ढा प्रदर्शनापुर्वीपासून चर्चेत आहे. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मिडियावर सुरु असताना आता चित्रपटावरून पुन्हा वाद होण्याची चिन्हे दिसत आहे. चित्रपटात भारतीय सैन्याचा (Indian Army) अनादर आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत आमिर, त्याचा चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट 11 ऑगस्ट ला रिलीज झाला. मात्र, प्रदर्शनानंतर चित्रपटावर वाद निर्माण झाला आहे. लाल सिंग चड्ढामधील भारतीय लष्कराच्या चित्रणामुळे सशस्त्र दलांचा अनादर झाल्याचा आरोप दिल्लीस्थित एका वकिलाने केला आहे. शुक्रवारी दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे त्यांनी तक्रार केली आहे. पॅरामाउंट पिक्चर्ससह चित्रपटाचे निर्माते, आमिर खान आणि दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
[read_also content=”भारतात आता VLC Media Player वापरता येणार नाही! सरकारचा मोठा निर्णय https://www.navarashtra.com/india/vlc-media-player-can-no-longer-be-used-in-india-big-decision-of-govt-nrps-315531.html”]
दिल्लीतील वकील विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलिसांकडे ही तक्रार केली आहे. “कारगिल युद्धात लढण्यासाठी एका मतिमंद व्यक्तीला लष्करात सामील होण्याची परवानगी देण्यात आली होती. कारगिल युद्ध लढण्यासाठी लष्करातील सर्वोत्तम जवानांना पाठवण्यात आलं होतं आणि कठोर प्रशिक्षित लष्करी जवानांनी युद्ध लढलं होतं. पण चित्रपट निर्मात्यांनी भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी मुद्दाम या परिस्थितीचं चित्रण केलं”, असं त्यांनी तक्रारीत लिहिलं आहे. त्यानुसार आयपीसी कलम 153 (दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी देणे), 153A (वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढवणे), 298 (कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे) आणि 505 (सार्वजनिक दंगल घडवून आणणारी विधाने) अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी त्यांनी केली.
संबंधित वकिलाने असाही आरोप केला आहे की चित्रपटातील एका दृश्याने धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या दृश्यामध्ये एक पाकिस्तानी कर्मचारी लाल सिंग चड्ढाला विचारतो की “मी नमाज अदा करतो, प्रार्थना करतो, लाल सिंग तू हे का करत नाही?” त्यावर लाल सिंगच्या भूमिकेतील आमिर म्हणतो, “माझी आई म्हणाली हा सर्व पूजापाठ मलेरिया आहे. त्यामुळे दंगल होतात.” चित्रपटातील हा संवाद संपूर्ण हिंदू समुदायाला उद्देशून बदनामीकारक असल्याचं वकिलांनी म्हटलं आहे.