
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या औचित्याने डोंबिवलीत एका भव्य आणि ऐतिहासिक संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. भगवती ग्रुप आणि हावरे प्रॉपर्टीज यांनी संयुक्तपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित ‘स्वराज्य’ या भव्य गृहनिर्माण योजनेची घोषणा केली आहे. इतिहासाचा अभिमान आणि आधुनिक जीवनशैली यांचा संगम घडवणारी ही योजना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला साजेशी ठरणार आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या संकल्पनेला अधिक प्रभावी रूप देण्यासाठी ‘स्वराज्य’ हे शीर्षक गीतही प्रदर्शित करण्यात आले आहे.
जीओडीचे सर्वेसर्वा स्वप्नील राऊत आणि अंकित शहा यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे गीत शिवरायांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या प्रेरणेची झलक दाखवते. सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांच्या दमदार आवाजात सादर झालेल्या या गाण्याला संगीतकार प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी भव्य, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक भावनेने भारलेले संगीत दिले आहे. हे गीत ऐकताना इतिहासाचा अभिमान, स्वराज्याची जाणीव आणि मराठी अस्मितेची उंची प्रकर्षाने जाणवते.
या गाण्यात निक शिंदे, तश्वी भोईर, अंकिता भगत, अस्मिता सुर्वे, विजय सोनावणे, रश्मी सोनावणे, अपूर्वा पाटील, सृष्टी बहेकर आणि वर्षा मोरेकर यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. तसेच हावरे प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा अमर हावरे यांनी पाहुणे कलाकार म्हणून विशेष उपस्थिती दर्शवली आहे. भगवती ग्रुपचे धरम पटेल आणि अमर हावरे यांच्या संयुक्त पुढाकारातून हे गीत लोकांसमोर आले असून, प्रदर्शित होताच शेकडो प्रेक्षकांनी त्यावर रील्स तयार करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना जीओडीचे संस्थापक स्वप्नील राऊत यांनी सांगितले की, ‘स्वराज्य’ हे नाव ऐकताच महाराजांचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. गाण्याच्या माध्यमातून ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, ही त्यांची मनापासूनची इच्छा होती. तर गायक रोहित राऊत यांनीही महाराजांवरील गीत गाताना विशेष अभिमान आणि भावनिक ऊर्जा जाणवल्याचे सांगितले. अमर हावरे यांनीही ‘स्वराज्य’ ही टाउनशिप ऐतिहासिक अभिमानाची बाब असल्याचे नमूद करत, ही संकल्पना महाराष्ट्रभर विस्तारण्याचा मानस व्यक्त केला. ‘स्वराज्य’ हे गीत केवळ एका योजनेचे शीर्षक नसून, ते छत्रपतींच्या वारशाची आठवण करून देणारे आणि स्वाभिमान जागवणारे प्रेरणादायी गीत ठरत आहे.
या गाण्याबद्दल मत मांडताना सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत म्हणाला, “माझा मित्र प्रशांत नाकतीचा मला फोन आला. आणि त्याने मला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक गाण लिहिले आहे, ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा लगेच मी त्याला हे आपण रेकॉर्ड करूया असं म्हटलं. इतर गाण्यांपेक्षा महाराजांच गाणं गाताना मला जास्त आनंद होतो, जास्त अभिमान वाटतो. या गाण्याचं संगीतही एतकं सुंदर झालं आहे की ते ऐकतानाही अंगावर काटा येतो. त्यामुळे हे गाणं मी गायलं याचा मला सार्थ अभिमान आहे”.