
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचा संगम साधत विविध विषय, शैली आणि सादरीकरणाच्या माध्यमातून नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच प्रयोगशीलतेला आणखी एक वेगळी दिशा देणारा नवा उपक्रम म्हणजे ‘बनवा बनवी’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर झळकणार आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर आपल्या हटके कंटेंटने लोकप्रिय झालेली इन्फ्लुएन्सर गँग आता थेट रंगमंचावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रभात थिएटर्सच्या बॅनरखाली ‘लागली पैज’नंतर सादर होणारी ही दुसरी निर्मिती असून ‘बनवा बनवी’ या नावालाच एक वेगळी ओळख आणि कल्ट व्हॅल्यू आहे. या नाटकाचे निर्माते ज्योती प्रमोद कठापूरकर आणि निखिल एकनाथ करंडे आहेत, तर प्रियंका हेमंत जोगी सह-निर्मात्या म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. हर्षद प्रमोद कठापूरकर कार्यकारी प्रमुख म्हणून संपूर्ण निर्मितीची धुरा सांभाळत आहेत.
या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर खांडेकर यांनी केले आहे. त्यांनी सोशल मीडिया आणि रंगभूमी यांचा अनोखा मेळ घालत ही कथा उभी केली आहे. नाटकात शंतनू रांगणेकर, ऋषभ मोरे, सुमित चव्हाण, ओंकार कदम, सोनाली गुरव, सिद्धी पोतदार आणि सुधाकर सोनावणे ही सात जणांची टीम प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही संपूर्ण टीम आपल्या भन्नाट अभिनयाने आणि भन्नाट टाइमिंगने रंगमंचावर धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाली आहे.
नाटकाचे नेपथ्य डॉ. सुमित पाटील यांनी साकारले असून वेशभूषेची जबाबदारी चारूलता देशपांडे यांनी घेतली आहे. त्यामुळे नाटकाच्या सादरीकरणात दृश्य आणि शैलीचा उत्तम मिलाफ पाहायला मिळणार आहे. या कलाकारांनी सोशल मीडियावर अल्प वेळेत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असलं तरी, आता पूर्ण वेळ रंगमंचावर आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. “आम्ही फक्त काही मिनिटांचे कलाकार नाही, तर पूर्ण लांबीचं नाटक उचलण्याची ताकद आमच्यात आहे,” अशी भावना शंतनू रांगणेकर यांनी व्यक्त केली आहे.
Manish Malhotra Mother Dies: बॉलीवूडवर शोककळा! गुढीपाडव्याच्या दिवशीच मनिष मल्होत्राला मातृशोक
दिग्दर्शक समीर खांडेकर यांनी सांगितले की, त्यांचा नाटक आणि डिजिटल माध्यमांशी आधीपासूनच जवळचा संबंध आहे. इन्फ्लुएन्सर गँगमधील टॅलेंट ओळखून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या अभिनयाच्या आवडीला व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी हे नाटक लिहिले. प्रत्येक कलाकारामध्ये असलेल्या रंगभूमीच्या ओढीमुळेच ‘बनवा बनवी’ची निर्मिती शक्य झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. शेखर दाते या नाटकाचे सूत्रधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
मनोरंजन, विनोद आणि आधुनिकतेचा संगम असलेलं ‘बनवा बनवी’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार असून, प्रेक्षकांना एक वेगळा आणि ताजातवाना अनुभव देण्यास सज्ज आहे. सोशल मीडिया ते रंगमंच असा प्रवास करणाऱ्या या टीमचा हा नवा प्रयोग प्रेक्षकांना किती भावतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.