
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
चित्रपटगृहांत दमदार यश मिळवून आशयघन मांडणीमुळे प्रेक्षक आणि समीक्षकांची मनं जिंकणारा ‘गोंधळ’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र यावेळी चर्चा चित्रपटाच्या कथानकाची किंवा पुरस्कारांची नसून, दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या आलिशान गाड्यांच्या खरेदीची आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी एकाच दिवशी तब्बल चार लक्झरी गाड्या खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे, आणि ही माहिती मिळताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्समध्ये चर्चा रंगली आहे. हा सगळा मोठ्या ओटीटी डीलचा परिणाम तर नाही ना? असे प्रश्न लोकांना पडत आहेत.
जेहच्या वाढदिवशी Kareena Kapoor चा खास उपक्रम; झाड लावून दिला पर्यावरणाचा संदेश, पाहा फोटो
‘गोंधळ’ हा चित्रपट लवकरच एखाद्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ किंवा झी फाईव्हसारख्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट विकला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्यवहार कोट्यवधी रुपयांत झाल्याची चर्चा आहे. संतोष डावखर यांच्याकडे आधीपासूनच मेबाखसारखी आलिशान गाडी असताना त्यांनी रेंज रोव्हर, डिफेंडर, बीएमडब्ल्यू आणि बीवायडी सीलायन या गाड्यांचा आपल्या कलेक्शनमध्ये समावेश केल्यामुळे ही डील खूपच मोठी असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूणच सहा कोटींहून अधिक किमतीच्या गाड्यांची खरेदी झाल्याची चर्चा रंगली आहे, मात्र अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही.
दरम्यान, ‘गोंधळ’ चित्रपटाच्या कथेबाबत बोलायचे झाले तर चित्रपटाच्या यशाची कहाणीही तितकीच प्रभावी आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाने अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) कडून मिळालेला प्रतिष्ठित सन्मान मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरला. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचे पुरस्कार मिळवत चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली. २२ व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्येही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान पटकावत ‘गोंधळ’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप पाडली.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)च्या इंडियन पॅनोरमा विभागात ५६ वर्षांत प्रथमच मराठी चित्रपटाने ‘सिल्व्हर पिकॉक’ जिंकण्याचा मान मिळवला, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी अभिमानाची बाब ठरली आहे. तसेच झी चित्र गौरव पुरस्कार २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक असे पुरस्कार मिळवत चित्रपटाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
एकाच चित्रपटाला मिळालेल्या या बहुआयामी यशामुळे ‘गोंधळ’ची ओटीटीवरील एन्ट्री कधी आणि कुठे होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असली तरी या चर्चांमुळे चित्रपट पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला आहे. ओटीटी डीलची बातमी खरी ठरते की नाही, हे लवकरच समोर येणार आहे. मात्र ‘गोंधळ’ने मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण केलेली चर्चा अजूनही कायम आहे, हे निश्चित.