
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘रुबाब’ चित्रपटातील अभिनेता संभाजी ससाणे याने चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, या चित्रपटात दाखवलेलं प्रेम त्यांना सर्वात जास्त आवडलं. त्यांच्या मते, ‘रुबाब’मध्ये प्रेम हे मिळवण्याची किंवा हक्क गाजवण्याची गोष्ट नसून जपून ठेवण्यासारखी भावना म्हणून दाखवले आहे. संभाजी याने सूरज या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना सांगितले की, ही भूमिका त्यांना खूप खरी वाटली. आयुष्यात त्यांनी असे अनेक लोक पाहिले आहेत, जे मनात खोल भावना ठेवतात पण त्या व्यक्त करताना अडखळतात.
सूरज हा विचारांनी स्पष्ट असला तरी भावनिक प्रसंगात जसे की प्रेम व्यक्त करताना किंवा वडिलांसमोर उभं राहताना तो नीट बोलू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.तो भावनांमध्ये टोकाचा आहे—तो खूप खोलवर प्रेम करतो किंवा पूर्णपणे दूर जातो. पण त्याचवेळी त्याच्यात एक शांत संवेदनशीलताही आहे. हाच विरोधाभास त्याला अधिक मानवी बनवतो. माझ्यासाठी हे फक्त एक पात्र साकारण्याबद्दल नव्हतं, तर मी वास्तवात पाहिलेल्या एका व्यक्तीला जगण्यासारखं होतं. आणि म्हणूनच मला वाटतं की अनेक लोकांना त्याच्यात स्वतःचा काही भाग दिसेल.
पुढे “आजच्या मराठी अभिनेत्यांकडून अधिक बहुपर्यायी असण्याची अपेक्षा ठेवली जाते का ? यावर व्यक्त होताना तो म्हणाला “मी लहानपणापासून कमल हासन आणि दिलीप कुमार यांसारख्या अभिनेत्यांना पाहत मोठा झालो आहे. त्यांची प्रत्येक भूमिकेत पूर्णपणे बदलून जाण्याची क्षमता मला नेहमीच आकर्षित करत आली. आमच्या घरी तमिळ, कन्नड, हिंदी, मराठी अशा अनेक भाषा होत्या, त्यामुळे मला वेगवेगळ्या संस्कृती आणि कथाकथन शैलींचा अनुभव मिळाला.
माझ्यासाठी versatility ही बाहेरून येणारी अपेक्षा नाही, तर आतून येणारी जबाबदारी आहे. एक अभिनेता म्हणून मला सतत विकसित व्हायची गरज वाटते. रुबाबमधला सूरज असो, बी.ई. रोजगारमधला पापड्या असो किंवा वेगवेगळ्या भाषांमधील माझं नाटक—प्रत्येक भूमिकेने मला वेगळ्या पद्धतीने आव्हान दिलं आहे आणि प्रत्येक वेळी मी काहीतरी नवीन शिकलो आहे”
मला वाटतं मराठी सिनेमात अशा स्तरित आणि अपूर्ण व्यक्तिरेखा खूप आधीपासूनच दिसत आहेत. जर आपण पिंजरा सारख्या चित्रपटाकडे पाहिलं, तर त्यातला शिक्षक हा एकाच वेळी गुंतागुंतीचा आणि अपूर्ण असा व्यक्तिरेखा आहे. त्याचप्रमाणे सामना, जैत रे जैत हे चित्रपटही मानवी भावनांच्या गुंतागुंतीवर आधारित आहेत. आजही मराठी चित्रपट निर्माते हीच परंपरा पुढे नेत आहेत आणि कलाकारांना अशा व्यक्तिरेखा साकारण्याची संधी देत आहेत. मला सूरजसारखी भूमिका मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तो एक चांगला मित्र आहे, खूप खोलवर भावना अनुभवतो, भावनांमध्ये टोकाचा आहे, पण त्याचवेळी स्वतःला व्यक्त करण्यात अडखळतो विशेषतः वडिलांसमोर. एखादी मुलगी त्याला प्रपोज करते तेव्हा तो असुरक्षित (vulnerable) होतो, पण त्याच्यात एक आक्रमक बाजूही आहे.
त्याच्यात खूप भावना आहेत ज्या तो पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही, आणि तो सतत त्या भावनांमधून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्यासाठी, एखादं पात्र परिपूर्ण असण्यापेक्षा मानवी असणं महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं प्रेक्षकही याच अपूर्णतेशी जोडले जातात.