मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याच्या ‘वेड’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाऊन तो चित्रपटाचे अनोख्या पद्धतीने प्रमोशन करीत असून त्याला चाहत्यांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘वेड’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कोल्हापूरमध्ये आलेल्या चित्रपटाच्या टीम कडून एक चूक घडली. रितेश देशमुखने थेट महालक्ष्मीच्या मंदिरात या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली.
रितेश देशमुख यांच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मीडिया ऑर्गनायझरकडून कोल्हापूरात पत्रकारांना हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनानंतर मंदिराच्या आवारात रितेश जिनिलीया माध्यमांशी बोलत असताना काही पत्रकारांनी त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली. एका पत्रकाराने नाराजी व्यक्त करत म्हटलं की, ‘आम्हाला निमंत्रण नव्हतं हे मान्य, पण आम्हाला कल्पना नव्हती की निवडक लोक आहेत की सगळ्यांना बोलू दिलं जाणार, पण आमच्या पाठी बाऊन्सर लावून हॉटेलमधून हाकललं. आमचा अवमान झालाय. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचवणं गरजेचं होतं.’
पत्रकाराच्या नाराजीवर रितेश देशमुखने त्यांची माफी मागितली, रितेश म्हणाला, तुम्हाला असं काही वाटत असेल आमच्याकडून तुमचा अवमान झालाय तर मी माफी मागतो. कोणाशी भेटणार हे मी काही ऑर्गनाईज केलं नव्हतं. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात त्यामुळे मी तुमची माफी मागतो.’
महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी आलेला रितेश पुढे म्हणाला, मी इथे चित्रपटासाठी, किंवा प्रमोशनसाठी आलेलो नाहीये. माझ्या लग्नाला 11 वर्षे झाली पण पत्नी सोबत दर्शनाला आलो नव्हतो. त्यामुळे आम्ही दर्शनासाठी आलोय. ही काही जागा नाहीये चित्रपटाविषयी बोलण्याची. तुमच्यावर महालक्ष्मीचा आशिर्वाद असावा हिच लक्ष्मीचरणी प्रार्थना.
कोल्हापुरातील चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी पत्रकारांना दिलेल्या वागणुकीवर ऑर्गनायझर विषयी नाराजी व्यक्त केली, तर रितेशची कोणतीही चूक नसताना त्याने मागितलेल्या बिनशर्त माफीमुळे नेटकऱ्यांनी रितेशचे कौतुकही केले आहे.