'तो मी नव्हेच...' ऑनलाईन फसवणूक झालेल्या प्रकरणावर सागर कारंडेची पहिली प्रतिक्रिया...
‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेला हास्यकलाकार, लेखक आणि अभिनेता सागर कारंडेला लाखोंचा सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी अभिनेत्याकडून मुंबईच्या सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अवघ्या दीडशे रुपयांसाठी अभिनेत्याला ६१. ८३ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. आता याप्रकरणावर अभिनेत्याने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने अभिनेत्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी सागरनं या प्रकरणावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच हे प्रकरण फेक असल्याचंही त्याने सांगितलं.
‘अशोक मा.मा.’ मालिकेत राधा मामी आणि किशाकाकांची धमाकेदार एंट्री; कथेत येणार आता नवा ट्वीस्ट…
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सागर कारंडेला काही प्रश्न विचारले, पण त्याने त्या प्रश्नांचं उत्तर देणं टाळलं. ‘मला या प्रकरणावर बोलायचं नाही…’ असं म्हणत अभिनेत्याने पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली. ‘सागर कारंडे नावाचे अनेकजण आहेत, गुगलवर तुम्ही सर्च केले, तर अनेकजण भेटतील’,असं माध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना सागर कारंडे म्हणाला. अभिनेता एका कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या गावी गेला होता. या कार्यक्रमावेळी अभिनेत्याला पत्रकारांनी ऑनलाईन फसवणुकी प्रकरणी काही प्रश्न विचारले होते. परंतु अभिनेत्याने त्या प्रश्नांना उत्तर न देता मौन धरणंच पसंद केलं.
पुन्हा एकदा स्वप्नील जोशी साकारणार दुहेरी भूमिका; म्हणाला, “चित्रपटात काम करताना तारेवरची कसरत…”
अभिनेता सागर कारंडे म्हणाला की, “मला ऑनलाईन फसवणुक प्रकरणावर काहीही बोलायचं नाही, ‘फेक आहे ते…’ त्याबद्दल नाही बोलायचं मला…” याप्रकरणावर गुन्हा दाखल झाला आहे का ? असा प्रश्न विचारताच सागर थोडासा चिडून बोलला की, “असू देत ना मग… सागर कारंडे एकच नाहीये खूप आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं, तर तुम्हालाही खूप दिसतील. जाऊ देत ना त्यांचं काम आहे, ते करतात. मरू देत ना… आपण कशाला लक्ष द्यायचं, पण हे प्रकरण खोटं आहे, माझ्यासोबत असं काही झालेलं नाही.” अभिनेत्याला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात मुंबई सायबर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
इन्स्टाग्रामवर लाईक्सच्या बदल्यात १५० रुपयांचं आमिष दाखवून अभिनेत्याची फसवणूक करण्यात आली आहे. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी अभिनेत्याच्या खात्यात २२ हजार रुपये देखील पाठवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अभिनेत्याच्या अकाऊंटमधून पैसे उकळण्यात आले. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. “इन्स्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा…” या प्रलोभनाला बळी पडलेल्या सागर कारंडेंची सायबर चोरट्यांनी तब्बल ६१ लाख ८३ रुपयांना फसवणूक केली. फेब्रुवारी महिन्यात सागरला एका अनोळखी व्हॉट्सअप नंबरवरून मेसेज आला होता. त्यामध्ये लाईक करा आणि पैसे कमवा अशा पद्धतीच्या जाहिरातीची माहिती पाठवण्यात आली होती.
तो अनोळखी व्हॉट्सअप नंबर एका महिलेचा होता. तिने त्या माध्यमातून अभिनेत्यासोबत संवाद साधला होता. टेलिग्रामसह अन्य सोशल मीडिया ॲपवरून पाठवण्यात येणाऱ्या इन्स्टाग्राम लिंकला लाईक करण्याचं काम तुम्हाला असल्याचं त्या महिलेने सागरला सांगितलं. प्रत्येक लाइकला दीडशे रुपये दिले जातील, अशा प्रकारे घरबसल्या सहा हजार रुपये कमावता येतील, अशी ऑफर असल्याचं सागरला सांगण्यात आलं. फारसं काही कठीण काम नसल्याने या कामाला सागरने होकार दिला. सागरने ठरल्याप्रमाणे काम आपण सुरु केल्याचं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्याला त्या ऑफर अंतर्गत सुरुवातीला २७ लाख रुपये भरावे लागले होते. अभिनेत्याला हे पैसे कमिशन आणि मोबदला यासाठी वॉलेटवर जमा करायला सांगितले होते.
शिवाय त्याचे पैसे कुठेही वापरले जाणार नाहीत, अशी ग्वाही सुद्धा दिली होती. त्यामुळे अभिनेत्याने हे पैसे भरले होते. त्यानंतर अभिनेत्याला ११ हजाराचं काम सुद्धा देण्यात आलं होतं. काही दिवसांनंतर सागरने त्याच्या वॉलेटमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला वॉलेटमधील पैसे काढू नये, टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील, असं त्याला सांगण्यात आलं होतं. शिवाय, १०० टक्के टास्क पूर्ण करण्यासाठी आणखी काही रक्कम भरावी लागेल. असे म्हणत सायबर चोरट्यांनी अभिनेत्याला आणखीन १९ लाख रुपये आणि त्यावर ३०टक्के कर भरण्यास भाग पाडलं, अशा प्रकारे अभिनेत्याकडून त्या चोरट्यांनी ६१ लाख रुपये उकळले. ही घटना घडल्यानंतर अभिनेत्याला आपली फसवणूक झाल्याची बाब समोर आली. अभिनेत्याला त्या चोरट्यांनी तुम्ही भरलेला कर चुकीच्या अकाऊंटमध्ये गेला आहे, असं सांगितलं. त्यामुळे तुम्हाला आणखीन पैसे गुंतवावे लागतील. पैसे मिळत नसल्याने अभिनेत्याला आपली फसवणूक झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्याने लगेच पोलिसांत धाव घेतली.
टॉलिवूड इंडस्ट्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन