
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग यावा असं आदित्यच्या चाहत्यांचं म्हणणं आहे यावर तुला काय वाटतं आदित्य आणि मेघनाची जोडी पुन्हा एकदा टिव्हीवर दिसायला पाहिजे का ? यावर ललितने स्पष्टीकरण दिलं. ललित म्हणाला की, या मालिकेचा दुसरा भाग यावा असं मला वाटत नाही. तो काळ तसा होता. तेव्हा दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांची तशी रेशीमगाठ जुळून आली आणि मालिका प्रेक्षकांना आवडली. तेव्हाच्या त्या काळातली ती जादू होती. ते तसंच छान आहे आणि त्याला धक्का लागायला नको असं मला वाटतं. प्रत्येक काळाची एक एनर्जी असते. त्यामुळे मला नाही वाटत की, त्याचा दुसरा भाग यावा, असं ललितने एका मुलाखतीत सांगितलं.
ललितच्या कामाबाबत सांगायचं झालंच तर, सध्या त्याचा नवा सिनेमा सुपर डुप्परचं प्रमोशन सुरु आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सुरु असलेल्या गप्पांमध्ये त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता. मालिकेच्या आठवणी सांगताना ललित म्हणाला, इतर मालिकांच्या तुलनेत आमची मालिका काहीशी वेगळी होती. जुळून येती रेशीमगाठीचं वेगळेपण म्हणजे या मालिकेत कोणतंही खलनायक किंवा नायिकेचं पात्र नव्हतं. मालिका कौटुंबिक होती आणि त्यातील पात्र हे कलारांनी, लेखकांनी आणि दिग्दर्शकाने इतके जिवंत ठेवले की पाहणाऱ्या प्रेक्षकाला ते आपले वाटायला लागले. आणि तिथेच मालिकेने प्रेक्षकांचं प्रेम जिंकलं. “माझ्या करिअरमध्ये ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिका खूपच महत्त्वाची होती. अगदी आजही मला सोशल मीडियावर रोज मेसेजेस येत असतात की, आम्ही सात ते आठ वेळा ही मालिका पाहिली. हे प्रेम खूप जास्त आहे. त्यावर कशा पद्धतीनं व्यक्त व्हावं मला कळत नाही; पण या प्रेमानं मला भारावून जायला होतं, असं ललितने सांगितलं.