West Bengal Politics News: पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! दुर्गापूजेपूर्वी १७ बंडखोर खासदार भाजपमध्ये सामील होणार?
खासदार बसुनिया म्हणाले की, १७ खासदारांपैकी ३ अल्पसंख्याक खासदार थेट भाजपमध्ये जाणार नाहीत. अबू ताहीर आणि खलीलुर रहमान या खासदारांना वेगवेगळे विभाग दिले जातील आणि ते बाहेरून रालोआ (NDA) सरकारला पाठिंबा देतील. त्यांच्या मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याक मतदारांची संख्या जास्त असल्याने ते थेट भाजपमध्ये प्रवेश करू शकत नाहीत; तसे केल्यास त्यांना स्थानिक पातळीवर अडचणी येऊ शकतात.
आपल्या दाव्याचा विस्तार करताना बसुनिया म्हणाले, ” भाजपनेच आम्हाला तृणमूल सोडून NCPI मध्ये जाण्यास सांगितले होते. परंतु,आमची सर्वांची भाजपमध्येच जाण्याची इच्छा होती. सर्व काही सुरळीत राहिल्यास, आमच्या २० पैकी १७ खासदार दुर्गापूजेपूर्वी भाजपचा झेंडा हातात घेतील.”
कूचबिहारचे खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया रविवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात आपल्या घरी परतले. ते घरी आल्याची बातमी पसरताच सिताई परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला. सिताई बस स्थानकाजवळ असलेल्या टीएमसी कार्यालयात कथित तोडफोड करून त्याला आग लावण्यात आली. स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या एका गटाने खासदार बसुनिया यांच्या घरासमोर जमून जोरदार निदर्शने केली.
१४ जून रोजी तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय) मध्ये विलीन होण्याची घोषणा केली. या खासदारांनी केंद्रातील सत्ताधारी एनडीएला आपला पाठिंबाही जाहीर केला. पक्षांतरबंदी कायद्यानुसार, अपात्रता टाळण्यासाठी २० पैकी किमान १४ खासदारांनी पक्षात सामील होणे आवश्यक आहे. त्यामुळे, १७ खासदार भाजपमध्ये सामील झाल्याचा दावा याच दोन-तृतीयांश तरतुदीशी जोडलेला आहे.
तीन खासदार भाजपमध्ये सामील होणार नाहीत
बसुनिया यांनी सांगितले की, २० एनसीपीआय खासदारांपैकी तीन अल्पसंख्याक खासदार औपचारिकपणे भाजपमध्ये सामील होणार नाहीत. यासाठी त्यांनी आपापल्या मतदारसंघातील राजकीय आणि प्रशासकीय परिस्थिती हे कारण दिले. अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण हे भाजपमध्ये सामील होण्याऐवजी बाहेरून एनडीएला पाठिंबा देतील. या नेत्यांना भविष्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या किंवा खाती मिळू शकतात.






