पंजाब सीएम भगवान मान आणि आतिशी मार्लेना राघव चड्ढा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Raghav Chadha News : नवी दिल्ली : आम आदमी पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. खासदार राघव चड्ढा यांच्याविरोधात पक्षातून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. राज्यसभा गाजवणारे आणि जनतेमध्ये नेहमी चर्चेत असलेले राघव चड्ढा यांना आपने उपनेते पदावरुन काढून टाकले आहे. या कारवाईनंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत जनतेसाठी आवाज उठवणे हे काय पाप आहे का असा प्रश्न आप वरिष्ठांना केला. यावरुन आता आपमधील (AAP) सर्व नेत्यांनी राघव चड्ढा यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.
आप नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खासदार राघव चड्ढांवर निशाणा साधला. मान म्हणाले की, “पक्षाच्या संसदीय मंडळाचे नेते वेळोवेळी बदलतात आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे. स्वतःचे उदाहरण देत ते म्हणाले की, २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनीही डॉ. धर्मवीर गांधी यांची जागा घेतली होती. असे अनेक गंभीर मुद्दे आहेत ज्यावर खासदारांनी सभात्याग करावा किंवा आवाज उठवावा अशी पक्षाची अपेक्षा असते, अशी प्रतिक्रिया भगवंत मान यांनी दिली.
हे देखील वाचा : “राघव, तुम्ही घाबरलेले..PM मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता; AAP नेत्याने सगळंच काढलं बाहेर
पुढे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, “जेव्हा एखादा खासदार असे करण्यात अपयशी ठरतो, तेव्हा ते व्हीपचे उल्लंघन ठरते. व्हीपचे उल्लंघन केल्याबद्दल नंतर कारवाई केली जाते. पश्चिम बंगालमधील मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्याचा मुद्दा असो किंवा गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची अटक असो, राघव चड्ढा यांनी त्याऐवजी संसद कॅन्टीनमधील समोशांच्या वाढत्या किमती आणि पिझ्झा डिलिव्हरीला होणारा विलंब हे मुद्दे उपस्थित केले. मला वाटते की ते तडजोड करण्यास तयार नाहीत.” अशी प्रतिक्रिया भगवंत मान यांनी दिली. यामुळे आप पक्षामध्ये राघव चड्ढा यांच्याविरोधात वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
हे देखील वाचा : Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या अतिशी यांनी देखील चड्ढा यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, राघव चड्ढा हे पंतप्रधान मोदींच्या मांडीवर बसले आहेत. चड्ढा कोणत्याही मुद्द्यावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलण्यास घाबरतात. अतिशी म्हणाल्या की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने आणलेल्या महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास चड्ढा यांनी नकार दिला. विरोधी पक्षांनी सभात्याग केला तेव्हा ते सभागृहात बसून राहिले, अशी प्रतिक्रिया आतिशी यांनी देखील दिली आहे. त्यामुळे खासदार राघव चड्ढा यांच्याविरोधात आम आदमी पक्षामध्ये वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.






