अंजली दमानिया यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामधील नेत्यांचे वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य तसेच वागणुक यावरुन जोरदार वादंग निर्माण झाला आहे. महायुतीमधील अनेक सत्ताधारी नेते व मंत्री हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरुन आता समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच अजित पवार व मामिकराव कोकाटे यांच्या अर्धा तास झालेल्या भेटीवर देखील त्यांनी टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, अजित पवारांनी सुरुवातीला असे म्हटले होते की जर शिंदेंच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच आम्ही आमच्या मंत्र्यांवर कारवाई करणार, याला स्पर्धा म्हणावी लागेल. ही धक्कादायक बाब आहे, असा आक्रमक पवित्रा अंजली दमानिया यांनी घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, “अजित पवारांनी कोकाटेंना किती वेळा माफ करणार? असे म्हटल्याचे ऐकलं आहे. माणिकराव कोकाटेंनी यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी माफी मागितली आहे, असे सांगितले. यात आपल्याला थेट कारवाई कुठेही झालेली दिसत नाही. एकदा ओसाड गावची पाटील की म्हणजे कृषिमंत्री पद हे म्हणणं तिथेच खरं तर ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं. पण एकदा नाही अनेक वेळा विमा वरुन म्हणा, शेतकऱ्यांना मारलेले टोमणे म्हणा किंवा ओसाड गावची पाटील की म्हणा इतकी विधान करून सुद्धा कारवाई झाली नाही. आता तर थेट पत्ते खेळताना जेव्हा दिसतात, तरी जर कारवाई झाली नाही तर दुर्दैवी आहे,” असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी देखील ट्वीट करुन माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत अंजली दमानिया म्हणाल्या की, “अधिवेशनात काय करत होते, कोणी आरोप काय केले? मला त्याच्यात नाही पडायचे. आपल्याला दिसतंय की त्या अधिवेशनात पत्ते खेळत होते. एका मंत्र्याकडूनही अपेक्षा नक्कीच नसते. लोकांचे प्रश्न मांडायला तुम्ही तिथे अधिवेशनात जातात. हे जर तुम्ही कृत्य केलं, तर ताबडतोब राजीनामा झाला पाहिजे,” असे दमानिया यांनी ठामपणे सांगितले. अंजली दमानिया यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्द्यांवर चर्चा पाहायला मिळत आहे.