
'खासदारांचे पक्षांतर म्हणजे मतदारांच्या विश्वासघाताचा प्रयत्न...', ठाकरे गटातील संभाव्य फुटीवर अंजली दमानिया आक्रमक
यावेळी दमानिया यांनी स्पष्ट केले की, त्या उद्धव ठाकरे गटाच्या समर्थक नाहीत आणि अनेक मुद्द्यांवर त्यांनी ठाकरे तसेच शरद पवार यांच्या राजकारणावर टीकाही केली आहे. मात्र, जनतेने एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर आणि विचारसरणीवर विश्वास ठेवून निवडून दिलेल्या खासदारांनी नंतर भूमिका बदलणे हे मतदारांच्या विश्वासाचा अनादर असल्याचे त्यांनी सांगितले.
Maharashtra Politics: ठाकरे गटातील ६ खासदारांच्या ‘या’ दिवशी होणार शिंदे गटात पक्षप्रवेश
त्यांनी आरोप केला की, मतदारांनी ज्या उमेदवारांना विशिष्ट राजकीय विचारांसाठी निवडून दिले, तेच लोक आता वेगळ्या राजकीय छावणीकडे झुकत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे “मत दिले तरी कशासाठी?” असा प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात निर्माण होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या.
पक्षांतरबंदी कायद्याचाही त्यांनी उल्लेख केला. एखाद्या गटाला वैध विभाजनासाठी दोन-तृतीयांश सदस्यांची आवश्यकता असते. त्यामुळे केवळ काही खासदारांच्या हालचालींनी कायदेशीर स्थिती बदलत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही राजकीय हालचाली या पडद्यामागून आखल्या जात असल्याची शंका व्यक्त करत संपूर्ण प्रक्रियेबाबत पारदर्शकता असावी, अशी मागणी केली.
दमानिया यांनी लोकशाहीमध्ये सशक्त विरोधी पक्षाचे महत्त्व अधोरेखित केले. सत्ताधारी पक्ष कितीही मजबूत असला तरी प्रभावी विरोधी पक्ष नसल्यास लोकशाहीचे संतुलन बिघडू शकते, असे त्या म्हणाल्या. विरोधी पक्ष कमकुवत होणे ही केवळ एका पक्षाची समस्या नसून लोकशाही व्यवस्थेसाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विविध राजकीय नेत्यांच्या बैठका, दिल्ली दौरे आणि सुरू असलेल्या चर्चांबाबतही प्रश्न उपस्थित केले. तसेच मतदारांच्या जनादेशाचा सन्मान राखण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन केले.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, खासदारांच्या संभाव्य पक्षांतराचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
मोठी बातमी! 6 खासदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ? संजय राऊत, अनिल देसाई दिल्लीला रवाना