Maharashtra Politics: ठाकरे गटातील ६ खासदारांच्या 'या' दिवशी होणार शिंदे गटात पक्षप्रवेश
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे खासदार सध्या दिल्लीत असून ते लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे पत्र सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या हालचालींबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
शिंदेसेनेचा वर्धापन दिन १९ जून रोजी मुंबईतील NESCO Exhibition Centre येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ठाकरे गटातील काही खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. वर्धापन दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील काही खासदारांमध्ये पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. संसदीय नियमांनुसार गटाला मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक संख्याबळाची अट पूर्ण झाल्यानंतरच पुढील राजकीय पावले उचलली जातील, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.
दरम्यान, ठाकरे गट किंवा शिंदेसेना यांच्याकडून या घडामोडींवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि दावे हे प्रामुख्याने सूत्रांच्या माहितीनुसार आहेत. आगामी काही दिवसांत संबंधित खासदारांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. या संभाव्य घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेनेतील आगामी घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सध्या हे सहा खासदार दिल्लीत असल्याची माहिती असून हे सर्वजण ६ खासदार सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. हे सहा खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे गटात सामील होणाऱ्या बंडखोर आमदारांच्या गटाला केंद्रातील मोदी सरकारमध्ये एक मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, खासदार फुटणार असल्याचे स्पष्ट होताच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून कोणत्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये, अशी विनंती केली आहे. तसेच, संजय राऊत यांनी या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगत सर्व खासदार निष्ठावान असल्याचा दावा केला आहे.






