
‘5 जुलैपासून आमरण उपोषण करणार’; RTI नियमांवर अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला इशारा, फुटीर खासदारांवरही टीका
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार (RTI) कायद्यात करण्यात आलेल्या नव्या नियमांविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. शासनाने 12 जून 2026 रोजी लागू केलेले नियम मागे घेतले नाहीत, तर 5 जुलैपासून राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षांतर करणाऱ्या खासदारांवरही जोरदार टीका केली.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या sहुलकात वाढ करण्यात येणार असून एकूण 12 नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. या बदलांवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे. शुल्कवाढ, ओळखपत्राची सक्ती आणि ‘एक विषय-एक अर्ज’ यांसारख्या तरतुदींमुळे माहितीचा अधिकार कमकुवत होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हे नियम तातडीने रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, “मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्याशी चर्चा झाली आहे. ते दोन दिवसांत भेटणार आहेत. त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला तर स्वागतच आहे. मात्र, समाधानकारक निर्णय झाला नाही तर 5 जुलैपासून माझे बेमुदत उपोषण सुरू होईल.”
ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याच्या घडामोडींवरही अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. पक्षांतराच्या राजकारणावर टीका करताना त्यांनी लोकप्रतिनिधींच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अशा पद्धतीने पक्ष बदल करणे योग्य नाही. याचा अर्थ श्रद्धा नाही, निष्ठा नाही आणि ध्येयवादही नाही. ज्याला समाजासाठी काहीतरी करायचे आहे, ज्याच्याकडे विचार आणि ध्येय आहे, तो पक्ष बदल करत नाही,” असे अण्णा हजारे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी स्वतःच्या हितासाठी राजकीय भूमिका बदलणाऱ्यांवरही निशाणा साधला. “जे लोक स्वतःचे हित साधण्यासाठी राजकारण करतात, तेच अशा प्रकारे पक्ष बदलतात,” अशी टीका त्यांनी केली.
माहिती अधिकार कायद्यातील बदलांवरून राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक झाले असून अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरावरूनही राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.