
संजय राऊतांच्या दाव्यानंतर बावनकुळेंचं मोठं विधान; '2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री
शिवसेना ठाकरे गटचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे वक्तव्य केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्रात 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. राज्याला फडणवीस यांच्यासारखे अष्टपैलू नेतृत्व लाभावे, ही 14 कोटी जनतेची भावना आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत यांनी फडणवीसांनी 2029 पूर्वी केंद्रात जाऊन देशाच्या नेतृत्वात भूमिका घ्यावी आणि त्यांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही शक्यता फेटाळत फडणवीसच दीर्घकाळ राज्याचे नेतृत्व करतील, असा दावा केला.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेनंतर विरोधकांनी सरकारच्या बचावकार्यावर टीका केली होती. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे, मात्र सरकार, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महानगरपालिका, पोलीस आणि इतर सर्व विभाग युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत.
ते म्हणाले की, सरकारचे संपूर्ण लक्ष अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि आवश्यक ती मदत पोहोचवण्यावर केंद्रित आहे.
बच्चू कडू म्हणाले की, “महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला राज्यातील नेता देशाचं नेतृत्व करताना पाहायचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत आली. त्यामुळे केवळ संख्याबळ नव्हे तर नैतिकतेच्या आधारावर फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रीपद शिंदेंनाच मिळायला हवे.”
बच्चू कडू म्हणाले, “देवा भाऊंनी निश्चितच दिल्लीची तयारी करावी आणि देशाची सूत्रे हाती घ्यावीत. महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी नेतृत्व करावं. देशात देवा भाऊ आणि महाराष्ट्रात शिंदे साहेब असा प्रवास झाला पाहिजे.”