
Devendra Fadnavis announces loan waiver to maharashtra farmers
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कर्जमाफीची तारीख स्पष्ट केली असून राज्यातील शेतकरी वर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आज (१७ मे) पुण्यातील कृषी महाविद्यालय येथील सिंचन नगर मैदानात ‘पुणे ऍग्रो हॅकॆथॉन २०२६ पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ” या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हि माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला असता ३० जुन पूर्वी कर्जमाफी केली जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही याबाबत भाष्य करत दुजोरा दिला आहे. सरकारच्या या मोठ्या घोषणेमुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी जून महिन्यात सरकारकडून कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमानंतर याबाबत प्रश्न विचारले असता फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी कर्जमाफी करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट
पुण्यातील कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, “कर्जमाफी संदर्भातील तयारी अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात कॅबिनेट उपसमितीची बैठक झाली आहे. आम्ही काही अधिकची माहिती मागवली आहे. ती आल्यानंतर आम्ही प्रक्रिया सुरु करू. ३० जूनपूर्वी कर्जमाफ़ी करणार आहोत,” असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “अजितदादा पवार आपल्यात नाहीत. शेतात बांधावर जाणारा नेता, धारा काढणारा नेता आपल्यात राहिलेला नाही, पण त्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. शेतमालाला चांगला बाजारभाव कसा मिळेल हे आम्ही पाहत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कायमच मदत केली आहे. शेतकरी सुखी समाधानी राहिला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पूर्वीचे अनुदान वाटप आणि आताचे अनुदान वाटप यात खूप फरक आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी शेतकऱ्यांना वीज सवलत दिली. शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेणारी हि मंडळी आहे. शेतकरी अडचणीत असताना त्यांना जास्तीत जास्त मदत या सरकारने केली आहे. एमआयचे धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. लवकरच कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री घेतील,” असे ते यावेळी म्हणाले.
झिशान सिद्दीकी यांची आमदारकी धोक्यात? तटकरेंच्या एका सहीमुळे सगळं फिस्कटणार?