
Congress Politics : काँग्रेसही तरुण राष्ट्रीय कार्याध्यक्षाच्या शोधात; 'या' नावांची जोरदार चर्चा सुरु
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच भाजपच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसमध्येही मोठ्या संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुका आणि त्यापूर्वी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, काँग्रेस पक्ष आता तरुण अध्यक्षाबाबत विचार करत असल्याची माहिती सध्या दिली जात आहे.
भारतीय जनता पक्षाने नुकतेच बिहारचे नेते नितीन नवीन यांची ‘राष्ट्रीय कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीने सर्वांनाच धक्का दिला होता. आगामी काळात तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच पक्ष नेतृत्वात बदल करून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा काँग्रेसचा मानस आहे.
दरम्यान, महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन पायलट यांचे नाव या पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहे. सचिन पायलट यांना राष्ट्रीय राजकारणात आणल्यास राजस्थानमधील अशोक गहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटण्यास मदत होईल.
पायलट यांची दिल्लीच्या राजकारणात मोठी भूमिका
पायलट यांची दिल्लीच्या राजकारणात मोठी भूमिका निश्चित करण्यासाठी त्यांना हे पद दिले जाऊ शकते. तसेच कर्नाटकचे मंत्री आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांच्या नावाचाही विचार सुरू आहे.
काँग्रेसमध्येही निर्माण होणार पद?
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे त्यांचे वय आणि प्रकृती स्वास्थ्य लक्षात घेता २०२९ च्या निवडणुकीपर्यंत त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी पक्षाला एका तरुण चेहऱ्याची गरज भासत आहे. भाजपने जे. पी. नड्डा यांच्यासोबत नितीन नवीन यांना राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्त केले. आता हेच मॉडेल काँग्रेस राबवू शकते. भाजपप्रमाणेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे नवीन पद निर्माण करण्याबाबत काँग्रेस श्रेष्ठींमध्ये गंभीर चर्चा सुरू आहे.
पाच राज्यांतील निवडणुका मुख्य लक्ष्य
आगामी काळात तमिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच पक्ष नेतृत्वात बदल करून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा काँग्रेसचा मानस आहे. अनुभवी नेतृत्वाला तरुणाच्या उत्साहाची जोड देऊन भाजपच्या रणनीतीला प्रत्युत्तर देण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याची चर्चा आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता