काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निशाणा सुरेश धस यांच्यावर निशाणा (फोटो - सोशल मीडिया)
बीड : मागील दोन महिन्यांपासून राज्याचे राजकारण बीडभोवती फिरते आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे अनेक राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. यामध्ये महायुतीच्या भाजपचे नेते व आमदार सुरेश धस यांनी देखील अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आवाज उठवला होता. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली असून चार तास बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे टीकेची झोड उठत आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचारसह अनेक गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केले. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरावे दिल्याचा दावा देखील सुरेश धस यांनी दिला होता. मात्र त्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाल्यामुळे टीकेची झोड उठवली गेली. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला. तर समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सुरेश धस हे न्यायासाठी लढतच नव्हते, असे म्हणत टीका केली आहे. यावर आता कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील महायुतीवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
सुरेश यांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे. यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. यावरुन टीका करताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “पहिले आगा आगा आगा, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती रेती, टिप्पर टिप्पर टिप्पर असे शब्द रांगड्या भाषेत मांडल्या जात होती. मात्र आता हे शब्द मागे पडलेत आणि आता मांडवली मांडवली मांडवली, या शब्दाची गुंज या प्रकरणातून ऐकू येत आहे.”, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीबाबत गौप्यस्फोट देखील केला आहे. सुरेश धस यांनी आका आका म्हणत बीडच्या राजकारणामध्ये रान पेटवले होते. मात्र नंतर भेट घेतल्यामुळे तेच संशयाच्या फेऱ्यामध्ये आले आहेत. याबाबत सपकाळ म्हणाले की, “टीआरपी वाढवण्याकरता केलेला हे सगळं प्रकरण होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार धस यांना दिलेली सूचना होती.” असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केला. महायुतीत भाजप इतर पक्षांना बदनाम करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला सपकाळ यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या भेट झाल्याचे समोर येताच टीकेची झोड उठवण्यात आली. यामुळे सुरेश धस यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट घडवून आणली होती. ही बैठक चार तास चालल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठली. ज्या व्यक्तीने आपल्या बदनामीचा प्रयत्न केला. त्याचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचे सुरेश धस म्हणाले आहे.