
Congress protest in Dharashiv, Congress protest, loan waiver to farmers, Congress, शेतकरी कर्जमाफी,
राज्यभरात विरोधी पक्षांकडून राज्य सरकारविरोधात मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी शेतकरी प्रश्नावरून सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आधीच संकटात असताना राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आणि फसवी असल्याचे सांगत हे आंदोलन करण्यात आले. सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात यावा या मागणीसाठी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतीकात्मक होळी करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
तसेच प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा रद्द करण्यात यावा. या महामार्गामुळे धाराशीव जिल्ह्यातील हजारो एकर सुपीक शेती आणि फळबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गदा येणार असल्याने, स्थानिक नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प तातडीने थांबवावा अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये संपूर्ण कर्जमाफी आणि महामार्ग रद्द करण्यासोबतच, शेतीमालाला हमीभावासह खरेदीची हमी द्यावी आणि शेतकरी, कामगार, युवक व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस नेत्यांसह काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. खरिप हंगामासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, “राज्यात बि बियाणांची टंचाई आहे, खतांची लिंकिंग करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांना नाही. पूर्वी राजे महाराजे राज्यात परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी वेशांतर करून जात व वस्तुस्थिती जाणून घेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेशांतर करून जातात पण दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी असा टोला सपकाळ यांनी लगावत फडणवीसांचे सरकार हे ‘आंधळे, बहिरे व मुके’ आहे,” असे ते यावेळी म्हणाले.