पवारांच्या तंबूत भगदाड! धैर्यशील मोहिते-पाटलांचा ‘अदृश्य हात’ ठरला निष्प्रभ; तीन आमदार महायुतीच्या दारात
शिवाजी हळणवर/पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील चारपैकी तब्बल तीन आमदारांनी थेट महायुतीच्या बैठकीत हजेरी लावत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे संकेत स्पष्ट केले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापूर शहरात झालेल्या महायुतीच्या बैठकीत माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या या नेत्यांची उपस्थिती म्हणजे पवार गटातील अंतर्गत नाराजी उघड झाल्याचे मानले जात आहे.
भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीने महाविकास आघाडीच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विशेष म्हणजे सांगोल्याचे शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे यांचीही उपस्थिती महायुतीच्या रणनीतीला अधिक बळ देणारी ठरली.
करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी यापूर्वीच राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला होता, तर डॉ. बाबासाहेब देशमुख हे राऊत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतानाही उपस्थित होते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने राजकीय आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीबाबत नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
नाशिक विधानपरिषदेच्या तिढा संपला ! अखेर गोकुळ गीतेंनी घेतला मोठा निर्णय
विशेष म्हणजे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यात झालेल्या या बैठकीने धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या राजकीय दाव्यांनाच धक्का दिल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. “महायुतीच्या उमेदवारामागे अदृश्य शक्ती काम करत आहे” असा आरोप करणाऱ्यांच्या गोटातच आता अस्वस्थता वाढल्याचे दिसत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वीच राजेंद्र राऊत हे ५०० पेक्षा अधिक मतांनी विजयी होतील असा दावा केला होता. आता विरोधी गोटातील नेत्यांची वाढती साथ पाहता तो दावा वास्तवात उतरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. एकीकडे मोहिते-पाटलांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, दुसरीकडे जयकुमार गोरे यांनी महाविकास आघाडीच्या गोटातच राजकीय सुरूंग लावल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात जोर धरत आहे.
सुनील तटकरेंची सुनेत्रा पवारांसमोरच भुजबळांवर आगपाखड; ‘छगन भुजबळ शिवसेनेत असताना…’






