
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला घाई, मग विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का?; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या या विमान अपघातावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे. पण ब्लॅकबॉक्समधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही व चौकशीही होत नाही, हा विलंब अनाकलनीय आहे. त्यामुळे संशय बळावत चालला आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला घाई केली गेली. मग विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
विमान अपघात प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली नाही. शपथविधीला जेवढी घाई केली तेवढी अपघाताच्या चौकशीसाठी करण्यात आली नाही. विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात शंका असल्याने निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.
हेदेखील वाचा : Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या ‘फोर स्टाफ ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात ‘डंके की चोट पर’ चीन प्रकरणावर लिहिले असून, मोदी सरकारने जबाबदारी झटकल्याचे उघड आहे, हाच मुद्दा राहुल गांधी लोकसभेत मांडत होते. चीन प्रश्नावर संसदेत चर्चा व्हायला पाहिजे व चीन सीमेवर काय झाले, हे जाणून घेण्याचा अधिकार भारत मातेच्या सर्व सुपुत्रांना आहे, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेत्याला न बोलू देणे निषेधार्ह
चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे व गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही. भारत सरकार चीन प्रश्नी काहीतरी सत्य लपवत आहे, म्हणून विरोधी पक्ष नेत्यालाही संसदेत बोलू दिले जात नाही हे अत्यंत निषेधार्ह आहे. मोदी सरकार संसदेच्या सर्व संकेत, परंपरा व नियम पायदळी तुडवत हुकूमशाहीपद्धतीने वागत असल्याचा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
…तोपर्यंत प्रश्न उपस्थित राहणारच
अजित पवार यांच्यासारख्या शिस्तप्रिय लोकनेत्याच्या बाबतीत असा अपघात व्हावा हे पटत नाही. जोपर्यंत या अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही तोपर्यंत असे प्रश्न उपस्थित होतच राहणार. या अपघाताने अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत आणि सरकार हे प्रकरण ज्यापद्धतीने हाताळत आहे त्यावर शंका आणखी वाढत आहेत. अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी एक पत्र तातडीने केंद्रीयमंत्र्याला पाठवले व त्याचे उत्तरही आले आणि तेथेच हे प्रकरण थांबल्याने पाणी कुठेतरी मुरतंय असे सपकाळ म्हणाले.
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्रीच नाही
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कोयता गँग, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, आका, खोके आणि बिश्नोई गँग हे त्याचेच परिणाम आहेत. सरकारच अशा प्रवृत्तींना खतपाणी घालत आहे.
– हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष