
'ऑपरेशन टायगर 'साठी ठेकेदाराचे ६०० कोटी?; खैरेंच्या आरोपाने राजकारणात खळबळ
मुंबई : ‘ऑपरेशन टायगर’वरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरून मोठा आरोप केला आहे. मराठवाड्यातील एका ठेकेदाराला उद्धव ठाकरे गट फोडण्यासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, हा विषय सध्या कायदेशीर गुंतागुंतीत अडकल्याने ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले.
चंद्रकांत खैरे यांनी इशारा देताना सांगितले की, गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. तसेच संबंधित सहा खासदारांविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी पक्षाशी निष्ठा राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “जे गद्दार होते ते आता पक्षातून निघून गेले आहेत. त्यामुळे पक्षात पुन्हा फूट पडणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी आहोत आणि दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देऊ”.
दरम्यान, खैरे यांनी बंडखोर खासदारांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी मराठवाड्यात शिवसेना मजबूत केली. येथून तीन-तीन खासदार निवडून आले. त्यांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रचार केला. मात्र, त्याच लोकांनी उद्धव साहेबांचाच अपमान केला. कुणी आई-वडिलांची शपथ घेतली, तर कुणी साईबाबांची शपथ घेतली; पण आता त्यांच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवायचा? जे उद्धव ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत, ते दुसऱ्यांचे काय होणार? ते भविष्यात त्यांनाही धोका देतील. हा सगळा पैशांचा खेळ आहे. पक्षात फूट पडणार असून, सहा जण जाणार असल्याची माहिती मला महिनाभरापूर्वीच मिळाली होती, असा दावा त्यांनी केला.
…हे कृत्रिम आणि खोटे बळ
खैरे पुढे म्हणाले की, सतत पक्षफोड करून राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यातून कोणताही खरा फायदा होणार नाही. हे कृत्रिम आणि खोटे बळ आहे. शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे. आम्ही सर्वजण अत्यंत नाराज आहोत. १९९१ मध्ये छगन भुजबळ १५ आमदारांना सोबत घेऊन वेगळे झाले होते, तेव्हाही आम्हाला मोठे दुःख झाले होते. आजही तसाच अनुभव येत आहे. मात्र, शिवसैनिकांनी नेहमी संघर्ष केला आहे आणि पुढेही करत राहतील, असे त्यांनी सांगितले.