(Photo - X)
Devendra Fadnavis : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हिंदी भाषेसंबंधीच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गट आणि मनसेकडून अमित शाह यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. “अमित शाहांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर अशी टीका झालीच नसती. त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर यांची थोबाडं काळी झाली असती,” असा जोरदार टोला फडणवीसांनी लगावला.
नवी मुंबईत झालेल्या राजभाषा संमेलनात अमित शाह यांनी हिंदी भाषेबाबत भूमिका मांडली होती. महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठी बहुभाषिक भूमी असल्याचं त्यांनी म्हटलं. मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकण्याला विरोध करणं योग्य नसल्याचंही शाह म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
या वादावर बोलताना फडणवीसांनी अमित शाहांचं संपूर्ण भाषण ऐकण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्रात मराठी भाषेचं महत्त्व काय आहे, मातृभाषेचं स्थान काय आहे, हे अमित शाहांनी आपल्या भाषणात स्पष्ट केल्याचं फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातील नागरिक बहुभाषिक आहेत म्हणजे त्यांची मातृभाषा बदलते असं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. “सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि त्यावर टीका करायची, हे योग्य नाही,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावलं.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टचीही जोरदार चर्चा आहे. “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच…” अशी मोजक्या शब्दांत पोस्ट राज ठाकरेंनी केली.
अमित शाह यांच्या राजभाषा संमेलनातील वक्तव्यानंतर ही पोस्ट करण्यात आल्याने त्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. जरांगे यांनी पुन्हा अर्ज केला असून त्यावर गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असं फडणवीस म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुण्यात मोठी गर्दी असते, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.






