
उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषेदची वाट कठीणच; आकड्यांची करावी लागणार जुळवाजुळव
मुंबई : राज्यात विधानसभा, नगरपरिषद, महानगरपालिका त्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुका पार पडल्या. आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागा येत्या १३ मे २०२६ रोजी रिक्त होत असून, यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आणि विधानसभा निवडणुकीतील संख्याबळामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का? याची चर्चा सुरु आहे. कारण, आता त्यांची विधान परिषेदची वाट कठीणच दिसत आहे.
विधान परिषदेची निवडणूक ही विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळावर आधारित असते. सध्याच्या विधानसभा रचनेनुसार महायुतीकडे २३५ हून अधिक आमदारांचे भक्कम पाठबळ आहे. या गणितानुसार, ९ पैकी ७ जागा महायुती सहजपणे जिंकू शकते. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे सध्या केवळ ४८ ते ५० आमदारांचे संख्याबळ आहे. एका जागेसाठी लागणारा मतांचा कोटा महाविकास आघाडीला केवळ १ जागा सुरक्षितपणे निवडून आणता येईल, असे चित्र दिसत आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काळात निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी अंतर्गत मोठा समझोता होऊ शकतो.
हेदेखील वाचा : Maan Political News : माण तालुक्यात जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा; पंचायत समितीत BJP-NCP समसमान
तसेच जर उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेसाठी शरद पवार किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्या बदल्यात विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरे यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी मित्रपक्ष मदत करू शकतात.
शिवसेनेकडे सध्या 20 आमदार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे सध्या विधानसभेत २० आमदार आहेत. पक्षाची ही एकमेव हक्काची जागा उद्धव ठाकरे स्वतःसाठी राखून ठेवतात की, पक्षातील दुसऱ्या निष्ठावान नेत्याला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर उद्धव ठाकरे यांना पुन्हा सभागृहात यायचे असेल, तर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या अतिरिक्त मतांची नितांत गरज भासणार आहे. मात्र, हे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी निर्णयावर अवलंबून आहे.
हेदेखील वाचा : स्थानिक निवडणुकानंतर आता विधान परिषदांच्या निवडणुकीकडे लागले लक्ष; अनेक रिक्त पदांवर निवड होणार