संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळी प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, खासदार संजय दिना पाटील यांचा पत्रकारांशी अपमानास्पद बोलण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, त्यांनी पाटील यांना पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्ला दिला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मी संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेईन आणि मग सविस्तर बोलेन. पण मी नुकतेच खासदार संजय दिना पाटील यांच्याशी बोललो आहे. त्यांनी मला सांगितले की पत्रकारांबद्दल कोणतीही नकारात्मक टिप्पणी करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांचे आणि पत्रकारांचे संबंध चांगले आहेत आणि कोणत्याही पत्रकाराच्या भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता.”
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “जे दररोज त्यांच्या विरोधात बोलतात, रोज त्यांच्याबाबत अपशब्द बोलतात. तोडून टाका, मारून टाका, तुडवा, अशा पद्धतीने खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात, मग तो देखील मीडियाचा अपमान आहे. हे बऱ्याच काळापासून सुरू आहे आणि त्यामुळेच संजय दीना पाटील संतप्त झाले होते. पण त्यांच्या मनात पत्रकारांबद्दल कोणताही द्वेष नव्हता. कोणत्याही लोकप्रतिनिधीने पत्रकारांबद्दल अशी वक्तव्ये करू नयेत. त्यामुळे, मी त्यांना पत्रकारांशी बोलून, जर त्यांनी त्यांच्याबद्दल काही अनुचित शब्द वापरले असतील तर दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे.”
“रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला गां## घुसताय. अरे कोणत्याही गोष्टीची लिमिट असते. सांगितलं ना सर्व. त्याने काही बोलूदे. तुझ्या आ## ### गेलं, आणि आता माझ्याकडे येऊ नका. माझ्याकडे काही घ्यायला आला तर मारणार. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार”, अशा भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला होता.






